अडीच लाख विद्यार्थ्यांची तपासणी... नक्‍की कसली आहे ही तपासणी आणि का केली?

‘बाल स्वास्थ्य’ वरदान
‘बाल स्वास्थ्य’ वरदान

महाड (बातमीदार) : अंगणवाडी आणि शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आजाराचे निदान उशिरा होत असल्याने भविष्यात त्यांना अनेक गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचा मोठा आधार मिळू लागला आहे. एप्रिल २०१९ पासून १८ वर्षांपर्यंतच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे; तर हृदयरोगासंबंधी २१ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ३९२ जणांवर अन्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना होणारे आजार भविष्यामध्ये गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे अशा आजारांवर वेळेत निदान व उपचार झाल्यास विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यासाठी सरकारने २०१९ पासून राष्ट्रीय स्वास्थ्य आरोग्य अभियान सुरू केले आहे. त्यानुसार अंगणवाडीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची म्हणजेच १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते.

अंगणवाडीमध्ये ही आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळा; तर शाळांमध्येही आरोग्य तपासणी वर्षातून एकदा केली जाते. यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीही नेमले गेलेले आहेत. आरोग्य तपासणीमध्ये तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना काही आजार आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी पाठवले जाते. त्यांचा आजार बरा होईपर्यंत त्यांच्यावर उपचार केले जातात. काही आजारांमध्ये शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये हृदयाचे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात. अशा विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया मोफत केली जाते. रायगड जिल्हा आरोग्य विभागाकडूनही अशा प्रकारची मोहीम शाळांमध्ये राबवली गेलेली आहे.

एप्रिल २०१९ पासून ६-१८ वयोगटातील १ लाख ९७ हजार ५३५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी १६ हजार ४४० मुलांवर उपचार करण्यात आले; तर अंगणवाडीतील ४४ हजार १०३ मुलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ५६० मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. 

एप्रिल २०१९ पासून आत्तापर्यंत २९ हृदयरोग असलेले विद्यार्थी आढळले आहेत. त्यापैकी २१ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ४१४ मुलांवर इतर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यापैकी ३९२ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

रिक्त पदे भरा
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबवण्याकरिता डॉक्‍टरांची मर्यादित संख्या अडसर ठरत आहे. त्यामुळे प्राथमिक आणि अन्य सरकारी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांच्या तपासणीतून आजाराचे निदान होते. त्याचबरोबर शस्त्रक्रिया होत आहेत. उपचारही घेत आहेत. अभियानाचा उद्देश रायगड जिल्ह्यात सफल होत आहे. 
- डॉ. अजित गवळी, शल्य चिकित्सक, रायगड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com