अतिवृष्टी बाधितांना ७५५ कोटींची मदत

मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय; निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा
Chief Minister Eknath Shinde news
Chief Minister Eknath Shinde newssakal

मुंबई : निकषात न बसणाऱ्या पण, सततच्या पावसाने बाधित झालेल्या राज्यातील सहा लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतला आहे. निकषात बसणाऱ्या ३० लाख शेतकऱ्यांना ३६०० कोटी रुपयांची मदत यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. ‘एसडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदतीचे वाटप करताना अनेक बाधित वंचित राहणार होते, तर मदतीची रक्कमही अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती. त्यामुळे या निकषांपलीकडे जाऊन अधिक मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे भरीव लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पाच लाख शेतकऱ्यांना लाभ

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी मदत करताना ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असेल तरच संबंधित शेतकरी मदतीस पात्र ठरण्याचा निकष आहे. या विहित निकषांमध्ये बसत नसतानाही अनेक शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर, असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लाभ मिळणारे जिल्हे (क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • औरंगाबाद १२६७९

  • जालना ६७८

  • परभणी २५४५.२५

  • हिंगोली ९६६७७

  • बीड ४८.८०

  • लातूर २१३२५१

  • उस्मानाबाद ११२६०९.९५

  • यवतमाळ ३६७११.३१

  • सोलापूर ७४४४६

एकूण क्षेत्र

५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र

एकूण निधी

सुमारे ७५५ कोटी रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com