आंतरजिल्हा प्रवास  ई-पासशिवाय कसा काय होतो?  उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

आंतरजिल्हा प्रवास  ई-पासशिवाय कसा काय होतो?  उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा


मुंबई : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचे असताना अनेक प्रवासी ई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करत आहे. त्यांची कोणतीही तपासणी न करता शहरातील प्रवासी ग्रामीण भागात जात असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून लोक दुसऱ्या जिल्ह्यात कसे जातात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोना रुग्णांची तपशीलवार आकडेवारी दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. पण मुंबई पुण्यातील अनेकजण मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. अनेक प्रवाशांकडे ई-पासही नसतो, यावरून प्रशासनांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. औरंगाबाद खंडपीठाने कोरोना उपचारांबाबत दाखल केलेल्या स्युमोटो जनहित याचिकेवर शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्या. टी. एन. नलावडे आणि न्या. मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्या. नलावडे यांनी नुकतीच जालना जिल्ह्यातील काही ठिकाणांची पाहणी केली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देतांना जुजबी प्रश्न विचारतात, मात्र ई-पासबद्दल विचारत नाही. त्यामुळे गावपातळीवर कोरोना वाढत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

कठोर भूमिकेची गरज
नियमांची चोख अंमलबजावणी करणे गरजे असून प्रसंगी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. कर्तव्यावर असलेले कर्मचारी चोख काम करतात की नाही, याची पाहणी करणे आवश्यक आहे; अन्यथा कोरोना संसर्ग अधिक बळावेल, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली.

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com