विरार ः सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून घरोघरी गणेशासाठी आकर्षक सजावट करण्यात आली असून त्याचा साग्रसंगीत पाहुणचारही सुरू आहे; मात्र या उत्सवाच्या रंगात जंजिरे-वसई किल्ल्यातील शिलाहारकालीन, वसई किल्ल्यातील गच्च झाडीत बंदिस्त असणारी श्री गणेशाची प्राचीन मूर्ती आजही उपेक्षित आहे. २००७ ला किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी ही मूर्ती प्रकाशात आणत प्राचीन धाटणीच्या एक विरगळीचा शोध घेतला होता; आजही या मूर्तीची दुरवस्था कायम आहे.
पालघर जिल्ह्यातील जंजिरे-वसई किल्ल्याचा प्रचंड विस्तार आणि संवर्धनातील अडचणी सर्वश्रुत आहेत. किल्ल्यातील प्रत्येक भागात, गच्च झाडीत बंदिस्त आणि आजही उत्खनन न झालेल्या भागात इतिहासाचा महत्त्वाचा संदर्भ दुर्लक्षित आहे. जंजिरे-वसई किल्ल्यातील किंवा नव्याने संशोधित झालेल्या मूर्ती अथवा अवशेषांचे निव्वळ गोदामात स्थलांतर करून काहीही साध्य होणार नाही, असा आरोप इतिहास अभ्यासक करत आहेत.
याबाबत अनेकदा ‘किल्ले वसई मोहीम परिवारां’तर्गत अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीतून विनंती पाठपुरावा करण्यात आलेला आहे. किल्ले वसई मोहिमेच्या दुर्गमित्रांनी अनेकदा या भागातील गच्च झाडी-झुडपे स्वच्छतेचा प्रयत्नही केला; पण केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून या बाबीवर अजूनही विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. या मूर्ती अत्यंत दुर्लक्षित आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
जंजिरे-वसई किल्ल्यातील नामशेष होणाऱ्या बहुमोल ऐतिहासिक संदर्भाबाबत मुंबई केंद्रीय पुरातत्त्व विभागास तिळमात्र जाणीव नसल्याचे निदर्शनास आले आहे. दिलेल्या विनंतीपत्रास लवकरच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असे उत्तर मिळते.
डॉ. श्रीदत्त राऊत, अभ्यासक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.