
पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या "माझी वसुंधरा' अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरचित्र संवादाद्वारे नुकतीच माहिती घेतली.
मुंबई : पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या "माझी वसुंधरा' अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरचित्र संवादाद्वारे नुकतीच माहिती घेतली. त्यांनी दोन्ही विभागांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केली. लोकप्रतिनिधी, सरकारचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी या वेळी केले.
हेही वाचा - संजय राऊत यांना लीलावतीतून डिस्जार्ज; रुग्णालयाबाहेर येताच विरोधकांवर डागलं टीकास्त्र
अनियमित पाऊस, निसर्गसारखी वादळे किंवा कोरोनासारखी संकटे ही सर्व हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली संकटे आहेत. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे येत्या काळात "माझी वसुंधरा' अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. याची सुरुवात सरकारी कार्यालयांमधून करण्यात यावी. सरकारी कार्यालयांमधील ऊर्जा, पाणी वापराचे लेखापरीक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधनसामुग्रीचे व्यवस्थापन, परिवहन साधनांचे लेखापरीक्षण, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालय परिसरातील वृक्षाच्छादन आदी बाबींवर काम करण्यात यावे. तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्यक्रमात या योजनेचा समावेश करावा, असे आवाहनही ठाकरे यांनी या वेळी केले. या वेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे हे मंत्रालयातून सहभागी झाले होते; तर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह दोन्ही विभागांतील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
भावी पिढीला स्वच्छ जमीन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि मुबलक ऊर्जा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. सर्वांनी समन्वयाने "माझी वसुंधरा' अभियान प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रास पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत अग्रभागी ठेवावे.
- संजय बनसोडे,
पर्यावरण राज्यमंत्री
-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )