मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र वैशिष्ट्य आहे, वेगवेगळी संस्कृती आहे, ती आपण जपली जावी. राज्याच्या कानाकोपऱ्यात ती पोहोचावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. शनिवारी (ता.१८) सह्याद्री अतिथीगृहात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागांतर्गत येणाऱ्या विविध संचालनालयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
हे नक्की वाचा ः वाद व्हावेत बाद
राज्यातील अनेक वैभवशाली ऐतिहासिक गडकिल्ल्यांची पडझड होत असल्याने गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षणावर भर देणे आवश्यक आहे. गडकिल्ल्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात प्राचीन संस्कृतीच्या खुणा असलेली कातळशिल्पे आढळून आली आहेत. त्यांचे संवर्धन झाल्यास देश-विदेशातील पर्यटक महाराष्ट्रात येऊ शकतील आणि त्यासाठीच राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या मदतीने प्राचीन कातळशिल्पांच्या संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य देईल. पर्यटकांच्या संख्येमुळे संरक्षित करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात येईल, असे देशमुख
यांनी सांगितले.
‘मुंबई बिनाले’ महोत्सव सुरू करणार
महाराष्ट्रात नाटक, सिनेमा, संगीत, मालिका याचा गौरवशाली इतिहास आहे. कला, संस्कृती आणि संगीत यांचा मेळ घालून ‘कोची मुझिरीस बिनाले’च्या धर्तीवर ‘मुंबई बिनाले’ महोत्सव सुरू करण्याचा विचार करता येईल, असे देशमुख यांनी सांगितले. मराठीबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या इतर भाषिक लेखकांचाही सन्मान करण्यास सांस्कृतिक विभाग पुढाकार घेईल, असे देशमुख म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.