अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता; वेळीच फवारणी केल्यास धोका टळणार

अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता; वेळीच फवारणी केल्यास धोका टळणार

 
अलिबाग - जिल्ह्याध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या ढगाळ वातावरणामुळे जिल्हयात अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या ढगाळ वातावरणासह पावसामुळे जिल्हयातील आंबा पिकावर  किडरोग, तुडतुडया सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचे उत्पादन सुमारे दहा टक्के घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. मात्र शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी केल्यास हा धोका टाळता येणार असल्याचे सांगण्यात आले. 
 

जिल्हयात सुमारे 14 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र असून उत्पादनाचे क्षेत्र 12 हजार 504 इतके आहे. आंब्याची लागवड करणारे जिल्हयात 35 हजारहून अधिक शेतकरी आहेत.   जिल्हयातील आंब्याला नवी मुंबईपासून मुंबई, पुणे तसेच अन्य राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आंब्याच्या उत्पादनातून कोट्यावधीची उलाढाल होते. जिल्हयामध्ये आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावून गेला होता. परंतू अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने रायगड जिल्हयात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अलिबाग, खालापूर, महाड अशा अनेक तालुक्यांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

ढगाळ वातावरणासह रिमझीम पावसामुळे तुडतुड्या सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यात मोहर काळा पडल्याने आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंब्याची फळ धारणा कमी  होऊन सुमारे दहा टक्के आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

 पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत 

 अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. अलिबागमधील कांदा चविष्ठ व औषधी समजला जात असल्याने या कांद्याला प्रचंड मागणी असते. अलिबागसह रोहा तालुक्यात पांढऱ्या कांद्याची लागवड सुमारे 280 हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत कांदा तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता होती. परंतू  ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसामुळे पांढरा कांदा अडचणीत आला आहे. या कांद्याला बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. 

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळ उत्पादनाचे नुकसान झाले आहे. फळबागांसह भाजीपाल्यालाही त्याचा फटका बसला आहे. या पावसामुळे आंब्यावर किड रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होणार आहे. 
 चंद्रकांत मोकल -
आंबा उत्पादक शेतकरी

ढगाळ वातावरणामुळे पांढऱ्या कांद्यावर बुरशीजन्य तर आंब्यावर तुडतुड्यासारखा रोग येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. 
दत्तात्रय काळभोर
- कृषी उपसंचालक 
 

Mango production in Konkan likely to decline due to unseasonal rains in raigad

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com