डोंबिवली : मोठागाव माणकोली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नाही आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे असल्याने येत्या काही दिवसांत या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अखेर नागरीकांनीच उद्घाटनची वाट न पाहता हा पूल वाहतुकीसाठी खुला करत त्यावरून वाहतुकीस सुरवात केली आहे. त्याचे व्हिडीओ देखील नागरिकांनी करत व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे ते डोंबिवली ते अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करणारा मोठागाव माणकोली उड्डाणपूलाचे काम मागील ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात आला आहे. मे 2023 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे एमएमआरडीए च्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र अद्याप हा पूल खुला झालेला नाही. भिवंडी व डोंबिवली दिशेकडील पोहोच रस्त्याचे काम काही प्रमाणात शिल्लक राहिले आहे.
मात्र त्या मार्गावर पूल सुरू होताच वाहन कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या मुख्य मार्गाला काही पर्यायी मार्ग जोडण्यात येत आहेत. या मार्गाचे काम तसेच मोठागाव येथील रेल्वे उड्डाणनपुलाचे काम, रिंगरूटचे काम शिल्लक आहे. ही कामे रखडल्याने उड्डाणपूल खुला केला जात नसल्याचे बोलले जात आहे. मुंबई, ठाणे तसेच भिवंडी वरून डोंबिवली दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मुंब्रा बायपास, कल्याण शीळ रोड, महापे रोड मार्गाने प्रवास करावा लागतो. मुंबई नाशिक महामार्गाची पावसाळ्यात खड्ड्यांनी चाळण झाली आहे.
तसेच या मार्गावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने तासनतास वाहन कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. तर दुसरीकडे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहन कोंडी, खराब रस्ता यामुळे त्रासलेल्या वाहन चालकांनी या पुलाचा वापर सुरू केला आहे. मानकोली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्याने वाहनांनी या पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नसल्याने एमएमआरडी ने काही ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळे निर्माण केले आहेत. अवजड वाहने सोडली तर इतर वाहने येऊ जाऊ शकत असल्याने ते वापर करत आहेत.
यासोबतच भिवंडी मधील सारंग, भारोटी, पिंपळास या आजूबाजूच्या गावातील महिला भाजीपाला, मच्छी विक्रीसाठी डोंबिवली परिसरात येतात. या महिला देखील याच पुलावरून पायी चालत प्रवास करतात. या भागातील नागरिक जॉगिंग, वॉकिंग करण्यासाठी येत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, कुटुंब फेरफटका मारण्यासाठी तर तरुण तरुणी याठिकाणी रील बनविण्यासाठी येतात यामुळे हा पूल सध्या चर्चेत आहे. त्यामुळे पुलावर सतत वाहने, नागरिक यांचा राबता आहे.
प्रवासातील वाचणारा वेळ लक्षात घेता तसेच पुलाचे काम पूर्ण झाल्याने पुलावरून वाहने ये जा करू लागली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पूल खुला होण्याची शक्यता असून नागरिक वाहन चालकांनी मात्र त्याआधीच पुलाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षे सप्टेंबर महिन्यातच वाहन चालकांनी या फुलाचा वापर सुरू केला होता.
याविषयीचे वृत्त देखील दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले होत. याची माहिती मिळताच हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा वाहन चालकांनी उद्घाटनाची प्रतीक्षा न करता वाहतुकीसाठी स्वतःच खुला केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याचे चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या काही दिवसात केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.