मुंबई : दोन वर्षांनंतर मनसेचा गुढी पाडवा मेळावा यंदा पूर्वीच्या उत्साहात पाडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली. मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं मग चर्चा चार भिंतीत का केली? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. (MNS Gudi Padawa Melava Raj Thackeray speech on Shivaji Park)
"जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला तशा अनेक गोष्टी तुमच्या विस्मरणात गेल्या. दोन वर्षांपूर्वीच्या घटनाही आपण विसरुन गेलो. २०१९ साली झालेली विधानसभेची निवडणूकही आपण विसरलो. भाजप-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस अशी निवडणूक होती. पण निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की, मुख्यमंत्रीपदाची अडीच-अडीच वर्षे ठरली होती. पण महाराष्ट्रात प्रचार सभा झाल्या तेव्हा कधी ते बोलले नाहीत. मोदींसोबतच्या सभेत तुम्ही फडणवीस मुख्यमंत्री होतील असं बोलला होता. अमित शहा देखील म्हणाले मुख्यमंत्री भाजपचा होईल, तेव्हाही उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. निकाल लागल्यानंतर मात्र त्यांनी टुम काढली. मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं आहे मग ही गोष्ट तुम्ही चार भिंतींमध्ये का केली? असा सवालही यावळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
या निवडणुकीतील तीन नंबरचा पक्ष, एक आणि दोन नंबरला फिरवतोय. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता? आधी शिव्या देतात आणि नंतर एकमेकांच्या मांडीवर बसतात. कारण सांगतात अडीच वर्षांचं तुमचं आतलं झेंगाट, याचा आमच्याशी काय संबंध. ज्या मतदारांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं, शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार? अशा शब्दांत राज यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.