
Mumbai : मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त पाणीसाठा; पाणीपट्टी दरवाढीवरून भाजप आक्रमक
मुंबई - पालिकेने १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रस्तावाला मुंबईत भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विऱोध केला आहे. तलेच मुंबईला राज्य शासनाच्या कोट्यातील अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले आहे.
मुंबई महानगरपालिकेने १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. लिटरमागे २५ पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. आमचा या दरवाढीला तीव्र विरोध आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
एकाबाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की, त्यांनी ही पाणी दरवाढ रोखावी, असेही ते म्हणाले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ४ जून पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. म्हणून राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती.
पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी सांगितले की, राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केले आहे. त्याबद्दल शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा - ३,८५० दशलक्ष लिटर
वर्षभर पाण्याची गरज - १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर
सद्याचा साठा - १ लाख ७४ हजार ९३ दशलक्ष लिटर
राखीव साठ्याला परवानगी (भातसा धरणातून) - ७५ हजार दशलक्ष लिटर मिळणार