
नातवावर असलेली आजीची माया आणि जन्मदात्या आई वडिलांचा अधिकार यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पालकांच्या अधिकाराला वरचढ ठरविले आहे
मुंबई, ता. 6 : नातवावर असलेली आजीची माया आणि जन्मदात्या आई वडिलांचा अधिकार यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पालकांच्या अधिकाराला वरचढ ठरविले आहे. मुलाचे शैक्षणिक, भावनिक आणि गुणात्मक भविष्य जन्मदात्या आई वडिलांकडे उज्वल आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
महत्त्वाची बातमी : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : शिवसेना खासदार संजय राऊतांनी मांडलेले 11 महत्त्वाचे मुद्दे
पुण्यात राहणाऱ्या उच्च शिक्षित पतीपत्नींने मुंबई उच्च न्यायालयात स्वतःच्या मुलाचा ताबा आजीकडून (पत्नीच्या आईकडून) मिळण्यासाठी याचिका केली होती. याचिकेवर न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकादारांचा विवाह सन 2008 मध्ये झाला. त्यांना एक बारा वर्षाचा मुलगा आहे.
सन 2019 मध्ये पत्नीची तब्येत बिघडली आणि तिच्या वर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांचे माहेर नाशिकमध्ये असल्यामुळे त्यांनी मुलाला काही दिवसांसाठी आईकडे ठेवले. मात्र त्यानंतर कोरोना आणि लॉकडाऊन जाहीर झाला. आता त्यांना मुलाला स्वतः जवळ ठेवायचे आहे मात्र मुलाच्या आजीने याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पालकांनी पोलिस तक्रार केली आणि बाल विकास समितीकडे दावा दाखल केला. यावर मुलाचा ताबा पालकांना देण्याचा आदेश झाला.
मात्र आजीने दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला. नातवाने दिलेल्या जबानीत आजीकडे राहायचे आहे असे सांगितले. परंतु मुलगा पढवून बोलत आहे असा आरोप करत आई वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली.
मुलाचा ताबा खंडपीठाने आईवडिलांना सुपुर्द केला. मुलाच्या शैक्षणिक, भावनिक, गुणात्मक, आरोग्य, बौध्दिक इ विकासासाठी पालकांना ताबा मिळणे आवश्यक आहे. मुलगा केवळ काही कालावधी साठी आजीकडे होता आणि लहानपणापासून तो आईवडिलांकडेच आहे. तसेच तो स्वतःचे मत मांडू शकत असला तरी न्यायालयात तो आजीच्या प्रभावाखाली बोलण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
पुढील तीन महिने आजीला दर शनिवारी नातवाला माणुसकी आणि संवेदनशील दृष्टीने भेटायला द्यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
mumbai high court on love of grandmother and rights of mother and father