मुंबई - नाना चुडासामा यांनी सतत सामान्यांचा विचार करून समाजातील विसंगती आणि राजकारण्यांवर दोन ओळींच्या बॅनरवरून मार्मिक टीका केली. कमीत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारे नाना हे ट्विटर येण्यापूर्वीचे खरे ट्विटर होते, अशा शब्दांत चुडासामा यांच्या कन्या व भाजप नेत्या शायना एनसी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
नरेंद्रसिंह मानसिंह चुडासामा ऊर्फ नाना चुडासामा यांच्या श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. या सभेला उद्योगपती बंधू मुकेश व अनिल अंबानी, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पूनम महाजन, मिलिंद देवरा, मंगलप्रभात लोढा, निरंजन हिरानंदानी, सुनील गावस्कर, माजिद मेमन, किरण शांताराम, अन्नू मलिक, सुनील शेट्टी, ऊर्मिला मातोंडकर, जुही चावला, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, पूनम ढिल्लॉं, रविना टंडन आदी मान्यवर उपस्थित होते.
आणीबाणी लादल्याबद्दल इंदिरा गांधी यांच्यावरील टीका, मतदान न करणाऱ्यांवर ओढलेले कोरडे, भ्रष्टाचाराची सुनामी, रस्त्यांवरील खड्ड्यांपासून देवानेच वाचवावे असे भाष्य अशा अनेक आठवणींना शायना एनसी यांनी उजाळा दिला. नाना यांचे वडील मानसिंह चुडासामा हे पोलिस अधिकारी होते. त्यामुळे त्यांना पोलिसांबद्दल अतीव आदर होता, ते वारंवार तसे बोलूनही दाखवत, असे त्यांनी सांगितले. "मुंबई माझी लाडकी', "आय लव्ह मुंबई', "जायंट्स ग्रुप' या त्यांच्या उपक्रमांची माहितीही शायना यांनी दिली.
|