औरंगाबादच्या नऊ वर्षीय मुलीची ठाण्यात हत्या

औरंगाबादच्या नऊ वर्षीय मुलीची ठाण्यात हत्या


ठाणे  : शिक्षणासाठी बाहेरगावी घेऊन जाण्याचा बहाणा करून घरकामास जुंपलेल्या नऊ वर्षीय मुलीची तिच्या नातेवाईकांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून मृतदेह ठेवलेल्या पिंपावर सिमेंटचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर हा मृतदेह कसारा घाटात फेकून देण्यात आला.

 याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.
औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या हिना चव्हाण यांची मुलगी भारती (वय ९) हिला मावसदीर प्रकाश ऊर्फ हज्जू राठोड (वय ३८) याने शिक्षणासाठी सहा महिन्यांपूर्वी उत्तन येथे आणले होते. परंतु, भारतीशी कोणताही संपर्क होत नसल्याने हिना यांनी ४ डिसेंबरला भारती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

मुलगी अल्पवयीन असल्याने भाईंदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शशिकांत भोसले आणि सहायक पोलिस निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाने मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, प्रकाश फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी प्रकाशची पत्नी अनिता हिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. भाचा आकाशने प्रकाश व अनिता यांना मदत केल्याचे कबूल केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिना यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने सहा महिन्यांपूर्वी प्रकाशने भारतीला शिक्षणासाठी उत्तन (भाईंदर) येथे घेऊन जातो असे सांगितले. मुलीचे शिक्षण होईल म्हणून हिना यांनीही भारतीला प्रकाशसोबत पाठविले.

उत्तन येथे आल्यावर प्रकाश आणि अनिता यांनी भारतीला शाळेत दाखल न करता तिच्याकडून घरकाम करून घेण्यास सुरुवात केली. काम न केल्यास बेदम मारहाण केली जात होती. तसेच तिला कमोडवर बसता येत नसल्याने प्रातःविधीवेळी शौचालय वारंवार खराब होत असल्याने त्यांना भारतीचा राग येत होता. त्यामुळे ते भारतीला हिरव्या मिरच्या खायला देत, उपाशी ठेवत असत. तसेच तिला आईशी मोबाईलवर जास्त बोलू दिले जात नसे. दरम्यान, ७ नोव्हेंबरला भारतीने कपड्यांमध्येच लघुशंका केल्याने प्रकाशने तिला बेदम मारहाण केली आणि तिचा गळा दाबून खून केला.

भारतीच्या मृतदेहाचा वास येत असल्याने प्रकाश आणि अनिताने मृतदेह नायलॉनच्या गोणीत भरून घरातील रिकाम्या पाण्याच्या पिंपात ठेवला. तसेच मृतदेहाची बाहेर दुर्गंधी पसरुनये यासाठी पिंपावर सिमेंटचे थर रचून पिंप तब्बल चार दिवस हा पिण्याच्या पाण्याचा पिंप बुजवून ठेवला होता. त्यानंतर प्रकाशने त्याचा भाचा आकाश याला भारतीची हत्या केल्याच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर भारतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी या तिघांनी मिळून भारतीचा  मृतदेह कसारा घाटातील दरीत फेकून दिला.

आरोपींना पोलिस कोठडी
पोलिसांनी अनिता आणि आकाश यांना अटक केली असून न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी प्रकाश हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com