Palghar News: इथं तांबड फुटताच धाऊ लागतात पाण्याचे टॅंकर, मोखाड्यात भीषण पाणी टंचाई

मोखाड्यात 83 गावपाड्यांना 26 टॅंकर द्वारे पाणीपुरवठा
Palghar News: इथं तांबड फुटताच धाऊ लागतात पाण्याचे टॅंकर, मोखाड्यात भीषण पाणी टंचाई

मोखाडा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण होते. गतसालच्या तुलनेने यावर्षी तालुक्यात एक महिना अगोदरच, जानेवारी महिन्यात पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. ऊन्हाच्या तिव्रतेने यावर्षी पाणी टंचाई ने ऊच्चांकी आकडा गाठला आहे.

अर्ध्याहून अधिक मोखाडा तालुका पाणी टंचाई ने ग्रासला आहे. शासनाने तालुक्यात 83 टंचाई ग्रस्त गावपाड्यांना 26 टॅंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सर्व ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, म्हणून पहाटे तांबड फुटण्यापुर्वीच टॅंकर धरणांवर पाणी भरण्यासाठी जात असुन नागरीकांची तहान भागवत आहेत.

पुर्वीच्या ठाणे आणि आता पालघर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई चा तालुका म्हणून मोखाड्याची ओळख आहे. शासनाने टंचाई वर मात करण्यासाठी अनेक ऊपाययोजना केल्या मात्र, त्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

टंचाई काळात गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा ही एकमेव ऊपाययोजना शासनाकडून अनेक वर्षापासून सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जल जीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना आणली. मात्र, सदोष कामे आणि दिरंगाई मुळे ही योजना ही यावर्षी कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे याही वर्षी शासनाकडून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सूरू करण्यात आला आहे.

गतसालच्या तुलनेने यावर्षी एक महिना अगोदरच, मोखाड्यात जानेवारी पासुन पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. यावर्षी ऊन्हाचा तडाखा जास्त असल्याने, पाणी टंचाई ची दाहकताही वाढली आहे. गतसाली 73 गावपाड्यांना पाणी टंचाई ने ग्रासले होते.

त्यांना 23 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. तुलनेने यंदा टंचाई ग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढली आहे. सध्यस्धितीत 83 गाव पाड्यांमधील नागरीकांना टंचाई चा सामना करावा लागतो आहे.

या टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची तहान भागवण्यासाठी 26 टॅंकरद्वारे, दररोज 107 फेर्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे.

त्यासाठी प्रशासन आणि टॅंकर चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. तालुक्यातील पळसपाडा येथील वाघ प्रकल्प आणि नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरण अधिग्रहीत करण्यात आले आहे. येथुन पाणी भरून, टॅंकरद्वारे तालुक्यातील टंचाई ग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्यात येतो आहे.

प्रशासन आणि टॅंकर चालकांची तारेवरची कसरत

सर्व ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी दररोज पहाटे 3 : 30 ला तांबड फुटण्यापुर्वीच टॅंकर चालक धरणाची वाट धरतात. दिवसभरात एका टॅंकर ला 4 त 5 फेर्या वेळेत कराव्या लागतात. या सर्व कामांचे नियोजन, पंचायत समिती कार्यालयातील दिलीप सोनार हा केवळ एक कर्मचारी करत आहेत. विशेष बाब म्हणजे सर्व टॅंकर ला GPS प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी चोरी अथवा गैरप्रकाराला पायबंद बसला आहे. सदरचा कर्मचारी पहाटे 3 ला ऊठुन दिवसभराच्या कामाची रूपरेषा आखतो. नियोजनबध्द कामामुळे तालुक्यातील सुमारे 46 हजाराहून अधिक नागरीक आणि जनावरांची तहान भागवली जात आहे.

दरम्यान, पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी आहे. ऊन्हाचा तडाखा कायम असल्याने, टंचाई ग्रस्त गाव पाडे शंभरी गाठणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राज्यातील बहुतांश जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई आहे. तेथेही टॅंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे टॅंकर चा तुटवडा निर्माण झाला आहे. टॅंकर मिळवण्यासाठी आम्हाला ही भटकंती करावी लागत असल्याचे, एका टॅंकर चालकाने सांगितले आहे.

गोळीचापाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचापाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याचीवाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याचीमेट, कोलद्याचापाडा, चारणगांव, वाकीचापाडा, ठाकुरवाडी, गोमघर, वाशिंद, वाघवाडी, शेलमपाडा यांसह 83 टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना 26 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com