महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची उपस्थितीला प्राध्यापकांचा विरोध; अध्यादेश रद्द करण्याची मागणी

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची उपस्थितीला प्राध्यापकांचा विरोध; अध्यादेश रद्द करण्याची मागणी


मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील 100 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत. अंतिम वर्षाची परीक्षा पुढील महिन्यात घेण्यात येणार असल्याने त्यांच्या तयारी आणि निकालाची कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या या अध्यादेशामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका निर्माण होणार असल्याने तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी प्राध्यापकांच्या बुक्टू संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले आहे. या परीक्षा 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तर निकाल नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करावा लागणार आहे. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तर पत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे निकाल घोषित करणे आदी कामे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांना करावी लागणार आहेत. परीक्षेची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहाण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कार्यालयात उपस्थित राहताना कर्मचाऱ्यांनी सरकारच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे पालन करावे असे ही विभागाने म्हंटले आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे, या कालावधीत प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयांत उपस्थित राहाणे सक्तीचे करणे अयोग्य आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका असून यामुळे रुग्णांची संख्या वाढू शकते त्यामुळे सरकारने हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी बुक्टू संघटनेने केली आहे. यासाठी महाविद्यालयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

प्राध्यापक संघटनेचा विरोध

100 टक्के उपस्थितीबाबत काढलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. शिक्षकांच्या जीविताचा यात कुठेही विचार केलेला नाही. रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुर्णपणे सुरळीत नसताना उपस्थिती 100 टक्के सक्तीची करणे अनाकलनीय आहे. विद्यार्थी परीक्षा घरून देणार आणि शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये बोलवणार हे हास्यास्प्द आहे. याबाबत आपण लवकरच सरकारला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणार आहोत.
वैभव नरवडे -
महासचिव,  मुक्ता शिक्षक संघटना

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com