तानाजींच्या कर्मभूमीची असुविधांमुळे उपेक्षा 

तानाजी कर्मभूमी
तानाजी कर्मभूमी

पोलादपूरः "तान्हाजी द वॉरियर' या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथेवरील चित्रपटाने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्‍यातील उमरठ गाव चर्चेत आले आहे. उमरठ हे गाव नरवीर तानाजी मालुसरे यांचे कर्मस्थळ असून, त्यांचे समाधीस्थळही आहे. उमरठ येथे तानाजी यांचे स्मारक असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. "तान्हाजी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उमरठ या त्यांच्या कर्मभूमीकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत; मात्र असुविधांमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. उद्या (ता. 4) जयंतीनिमित्त तरी या कर्मभूमीकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आशीष शेलार बॅकफुटवर, त्या वक्तव्यावरून मागितली माफी...
 
पोलादपूर येथून उमरठ गाव 15 किलोमीटरवर आहे. रस्ता काही प्रमाणात डांबरी केला आहे. काही रस्ता हा खडतर आहे. पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील कापडे बुद्रुक या गावातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे आणि समाधीस्थळाकडे जाण्यास रस्ता आहे. उमरठ हे गाव नरवीर तानाजी मालुसरे यांचे कर्मस्थळ असून, त्यांचे मामा शेलार यांच्याकडे ते वास्तव्य करीत होते. उमरठ गावात त्यांचे स्मारक बांधले असून, कोंढाणा किल्ल्यावर वीरमरण आल्यानंतर त्यांचा देह पालखीतून उमरठ येथे आणण्यात आला. त्यानंतर समाधीही बांधण्यात आली. तानाजी मालुसरे यांच्या अंत्यविधी वेळी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजही हजर असल्याची इतिहासात नोंद आढळते.
 
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर निघालेला "तान्हाजी द वॉरियर' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर त्यांचे कर्मस्थळ असलेल्या उमरठ गावात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. 
मालुसरे यांच्या स्मारकाची मात्र दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी चंद्रकांत कळंबे यांनी केली आहे. पर्यटकांची संख्या वाढली असताना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय नसल्याने पर्यटकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. स्मारकात गवत वाढले आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे येथील पर्यटनवाढीच्या दृष्टीने सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. 

साडेतीनशे वर्षे जुने झाड 
तानाजी मालुसरे यांच्या स्मारकात एक आंब्याचे झाड असून, ते साडेतीनशे वर्षे जुने आहे. त्याकाळी यवनांच्या कारवाया होत आल्याने आंब्याच्या झाडाच्या ढोलीत मावळे हे हत्यार लपवून ठेवत असत. काही दिवसांपूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या. त्यातील दोन तलवारी येथे असून, बाकीच्या तलवारी पुणे येथे नेल्या आहेत. अजून या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत हत्यारे असल्याची माहिती अर्जुन पार्टे यांनी दिली. 

पर्यटनाच्या दृष्टीने उमरठ येथे खूप मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. भविष्यात पोलादपूर तालुक्‍यातील पर्यटनाला चालना द्यायची असेल तर उमरठ येथे भव्यदिव्य अशी शिवसृष्टी निर्माण करावी, ही सरकारजवळ मागणी आहे. 
- सिद्धेश कळंबे, उमरठ 

"तान्हाजी द अनसिन वॉरियर' या तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्रपटानंतर पोलादपूर तालुक्‍यातील उमरठ येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे; मात्र येणाऱ्या पर्यटकांना सोईसुविधा मिळाव्यात. राहण्याची व्यवस्था व्हावी. स्वच्छतागृह असावे यासाठी सरकारने लक्ष घालावे. 
- रामदास कळंबे, ग्रामस्थ, उमरठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com