ठाणे पोलिसांना सॅल्युट...

पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करताना आयुक्त विवेक फणसळकर
पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करताना आयुक्त विवेक फणसळकर

ठाणे : पोलिसांनी योग्य तपास केला नाही अथवा तपासात दिरंगाई झाल्याने गुन्हेगार सुटले, अशी ओरड नेहमीच होत असते. याला ठाणे पोलिसांनी छेद दिला आहे. 2019 या वर्षात ठाणे पोलिस आयुक्तालयातील 378 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून दोषसिद्धी करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करून आरोपींना शिक्षा होण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला. त्याचबरोबर दोषसिद्धीच्या प्रकरणात विशेष सहभागाबद्दल पैरवी (न्यायालयीन कामकाजात सहभाग) करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही गौरवण्यात आले. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये दोषसिद्धीमध्ये गुणात्मक वाढ झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

ठाणे पोलिस आयुक्तालयात ठाणे, कल्याण, वागळे इस्टेट, भिवंडी आणि ठाण्यातील उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रातील पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध गुन्ह्यातील तपासात नैपुण्य गाजवणाऱ्या पोलिसांचा सन्मान सोहळा साकेत पोलिस परेड मैदानात मंगळवारी (ता. 7) पार पडला.

यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. ठाणे पोलिस आयुक्तालयात कार्यरत असताना विशेष कौशल्य दाखवल्यामुळे आरोपींना शिक्षा झाली, अशा 65 अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. 

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर येथील सत्र न्यायालय आणि प्रथमवर्ग न्यायालयातील 378 प्रकरणांमध्ये दोषसिद्धी झाली असून या प्रकरणांत महिला, बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेप आणि 25 वर्षांपर्यंतच्या दिर्घ मुदतीच्या शिक्षा गुन्हेगारांना झाल्या आहेत.

याशिवाय फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत हत्या, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांत आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मुंब्रा, नौपाडा आणि कापूरबावडी पोलिस ठाण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. 

...या पोलिस ठाण्यांचा गौरव 
सत्र न्यायालयातील खटल्यांत जास्तीत जास्त दोषसिद्धी मिळवणाऱ्या मुंब्रा (प्रथम), कळवा, कापूरबावडी (द्वितीय) आणि निजामपुरा, कासारवडवली पोलिस ठाणे (तृतीय) आणि प्रथमवर्ग न्यायालयातील खटल्यांत जास्तीत जास्त दोषसिद्धी मिळवणाऱ्या कळवा (प्रथम), नौपाडा (द्वितीय) आणि कापूरबावडी, नारपोली (तृतीय) या पोलिस ठाण्यांचा गौरव करण्यात आला. 

बेवारस मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यविधी 
अनेक हत्येच्या गुन्ह्यातील अथवा दुर्घटनांमधील मृतदेहांची ओळख पटवणे मोठे जिकिरीचे काम असते. ओळख पटली तर, मृतदेहावर अंत्यसंस्कार प्रक्रिया करणे सुलभ बनते. बेवारस मृतदेह असल्यानंतर अंत्यसंस्काराच्या खर्चाचा पेच उद्‌भवतो. मात्र, यालाही ठाणे पोलिसांनी छेद दिला आहे. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल कडव यांनी मागील वर्षी 332 बेवारस प्रकरणांत चौकशी करून मृतांच्या वारसांचा शोध घेतला. तसेच सरकारी खर्चाने आणि स्व:खर्चानेदेखील बेवारस मृतदेहांवर अंत्यविधी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com