EXCLUSIVE : सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेहाल; जेवणासह राहण्याची सोय नाही; एसटीच्या आवारात झोपूनच काढताहेत रात्र

EXCLUSIVE : सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेहाल; जेवणासह राहण्याची सोय नाही; एसटीच्या आवारात झोपूनच काढताहेत रात्र

मुंबई : लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांच्या सेवेसाठी राज्य सरकारने एसटीच्या 1000 बसेस बेस्टला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विविध विभागातून मुंबईत बसेस दाखल झाल्या. त्यापैकी सांगली जिल्ह्यातून आलेल्या 120 कर्मचाऱ्यांची गेल्या दोन दिवसांपासून जेवणाची आणि राहण्याची सोय केली नसल्याने त्यांना बसस्थानकावरच रात्र काढावी लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एसटी आणि बेस्टच्या नाकर्तेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

मुंबईकरांना सेवा देण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटीच्या 1000 बसेस मुंबईत पाठवण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील निवडक विभाग नियंत्रकांना दिला होता. बस आणि कर्मचारी मुंबईत दाखल झाल्यानंतर कामगिरीवर असणाऱ्या चालक, वाहकांना वेळेवर जेवण नाश्ता, मिळतील याची जबाबदारी पुरवठादार कंपनीच्या प्रतिनिधींवर सोपविण्यात आली होती. मात्र, एसटीतील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मुंबईत आलेल्या सुमारे 10 विभागातील हजारो कर्मचाऱ्यांची साधी राहण्याचीही व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. कोरोनाच्या काळातही गेल्या दिन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना आंघोळी सुद्धा करायला मिळाल्या नसून, त्यांची विचारपूस करायला कोणी तयार नाही.

यामध्ये सांगली विभागातील तासगाव आगाराच्या 12, इस्लामपूर आगराच्या 12, विटा आगराच्या सहा अशा एकूण 30 बसेस सध्या पनवेल, कुर्ला, वांद्रे परिसरातील विविध ठिकाणी थांबल्या आहेत. मात्र, यातील सुमारे 120 कर्मचाऱ्यांची साधी राहण्याचीही सोय एसटी महामंडळाने किंवा बेस्ट प्रशासनाने केली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या कर्मचाऱ्यांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत असून, अद्यापही या कर्मचाऱ्यांची सोया केली नसल्याने, आता झोपायचं कुठे आणि खायचं काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

12 ऑक्टोबर रोजी सांगली विभागातील विविध आगराच्या बसेस घेऊन मुंबईत दाखल झालो, मात्र कोणतेही एक ठिकाण आम्हाला निश्चित सांगण्यात आले नाही. त्यामुळे काहीजण पनवेल, कुर्ला, वांद्रे अशा वेगवेगळ्या परिसरातील बस स्थानकावरच थांबले आहे. मुंबईत कोरोनाचा धोका असतांना सेवा देण्यासाठी आम्ही कुटुंब सोडून आलोय मात्र, इथे आमची काहीच सोय नाही. अशाने आता आम्हालाही भीती वाटायला लागली असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'सकाळ'ला  सांगितले.

परिवहन राज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील यांना संपर्क केला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, एसटी वाहतुकीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांच्याकडूनही प्रतिक्रिया मिळु शकली नाही.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com