मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लोकांना पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता येणार आहे. लॉकडाऊनसह गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. 15 ऑक्टोबर नंतर हे उद्यान सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून सुरूवातीला केवळ 'मॉर्निंग वॉक'साठी येणाऱ्या लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यात काही अडचणी आल्या नाही तर मग सर्वसामान्य लोकांसाठी देखील पार्क सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 हजारांहून अधिक लोकं मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्यातील 2 हजार लोकं दिवसाला येत असून या सर्व लोकांची नोंद उद्यान प्रशासनाने ठेवली आहे. या सर्व लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे तिन ग्रुप बनवण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येकावर लक्ष ठेवणे देखील सोपे जाणार आहे. सुरूवातीला यापैकी साधारणता 5 ते 6 हजार लोकं मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा सुनिल लिमये यांनी व्यक्त केली.
सुरूवातीला या लोकांना मर्यादीत ठिकाणी फिरता येणार आहे. यासाठी नव्याने काही मार्ग निर्धारित करण्यात येणार आहेत. सुरूवातीला लुंबी पाडा , कान्हेरी गुंफा मार्ग खुला करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यासाठी ऑनलाईन जाहिरात देखील करण्यात येईल. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतलं जाणार आहे. त्यानंतर येत्या 15 ऑक्टोबर नंतर प्रत्यक्ष मॉर्निंग वॉकसाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन संरक्षक जी. मल्लिकार्जूना यांनी दिली.
गेल्या सहा महिन्यातील लॉकडाऊनमुळे प्राण्यांना देखील शांततेची सवय लागली आहे. जंगलात दूरवर राहणारे अनेक प्राणी तसेच पक्षी खाली रस्त्यावर येऊ लागलेत. त्यांची काळजी ही प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उद्यान सुरू करताना या पशू-पक्ष्यांचा देखील विचार करावा लागणार आहे. अन्यथा हे मुके जीव बिथरण्याची शक्यता आहे. यासर्व बाबींचा विचार करून प्रशासन उद्यान सुरू करताना काळजी घेणार असल्याचे देखील मल्लिकार्जूना यांनी सांगितले.
कोरोना संसर्गामुळे सरकारने तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. या नियमांचं पालन राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान सुरू करताना देखील केले जाणार आहे. लोकं जॉगिंगसाठी जरी येणार असली तरी त्यांना तोंडावर मास्क लावल्याशिवाय उद्यानात प्रवेश करता येणार नाही. अद्याप प्राण्यांना बाधा होत असल्याचे निष्पन्न झाले ऩसले तरी अनेक लोकं पशु-पक्ष्यांच्या जवळ जात असल्याने त्यापासून प्राण्याच्या आरोग्याला कोणताही धोका पोहचू नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय आपल्याकडील मास्क उघड्यावर फेकण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. पूर्वी प्रमाणे पाण्याची बाटली देखील आत नेता येणार नसून नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
---------------------
(संपादनः पूजा विचारे)
Sanjay Gandhi National Park On way Unlock will start after 15th October
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.