
भाजपने निष्ठावंतांना डावलले : राऊत
मुंबई - इतर पक्षांतून आलेल्यांनाच भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली असून जे निष्ठावान आहेत, संघ परिवाराशी संबंधित आहेत आणि वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचे मत व्यक्त करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला आज टोला हाणला.
संजय राऊत म्हणाले, ‘भाजपमध्ये संघाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते अस्ताना शिवसेना, काँग्रेसमधून फिरून बाहेर पडलेल्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे, याचे मला आश्चर्य वाटते. भाजपमध्ये नाराजी आहे. हा जुना भाजप राहिलेला नाही. बाहेरच्या लोकांनी एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेतला आहे. शिवसेनेने मात्र निष्ठावंतांना उमेदवारी दिली आहे.’
राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. राऊत म्हणाले की, ‘‘भाजपला या राज्यात घोडेबाजार करायचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्की संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती. पण भाजपने आधी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा, सहाव्या जागेसाठी उभे करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाऱ्यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.’’
Web Title: Sanjay Rout Criticize On Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..