Traffic Rule : सीटबेल्ट सक्ती आजपासून लागू!

अंमलबजावणीसाठी पोलिस सज्ज
seat belt
seat belt

मुंबई : मुंबईत चारचाकी वाहनांतून प्रवास करताना मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे सक्तीचे असून त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिस सज्ज झाले आहेत. सीटबेल्ट नसलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मागील सीटबेल्ट लावण्यासाठी पोलिसांनी दिलेली १५ दिवसांची मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपल्याने मंगळवारपासून नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सीटबेल्ट लावलेला नसल्याने अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी काही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक परिसराच्या स्थानिक वाहतूक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.

स्थानिक पोलिस त्यांना मदत करतील. मुंबई वाहतूक पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी वाहनचालकांसाठी नवीन आदेश जाहीर केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिस कारवाई केली जाणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

संमिश्र प्रतिसाद

पोलिसांच्या आदेशाला सर्वसामान्य मुंबईकर संमिश्र प्रतिसाद देत आहे. ‘पोलिसांच्या निर्णयामुळे जीव वाचणार आहे की अजून एका नियमाची भर पडणार आहे. आदेशाचे पालन करणे आणि पोलिसांनीही ते योग्य प्रकारे करवून घेणे गरजेचे आहे,’ अशी प्रतिक्रिया दिनेश पाटील यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने नियम महत्त्वाचे आहे; परंतु त्यांच्या नावे पोलिसांच्या कारवाईचा त्रास होऊ नये, अशी अपेक्षा व्यापारी आश्विन मोटा यांनी व्यक्त केली.

असा नियम... असा दंड

१ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांचे परिवहन आयुक्त अन् पोलिस महासंचालकांना परिपत्रक पाठवले आहे. सुधारित मोटार वाहन दुरुस्ती कायद्यानुसार सीटबेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्यांना दंड आकारला जाईल.

२ मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ च्या कलम १९४ (ब) (१) नुसार चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

3 सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीट बेल्ट लावलेला नसेल तर ५०० रुपयांपासून दंड करण्यात येणार आहे.

४ मोटरसायकल आणि तीनचाकी वाहने वगळता सर्व वाहने चालक व वाहनामध्ये बसलेल्या व्यक्तीसाठी सीटबेल्टने सुसज्ज असतील.

नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्याही मोठी आहे. खड्ड्यातून उद्‍भवणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल सरकार कधी आदेश काढणार?

- विशाखा सिंह, एक्झिक्युटिव्ह

१ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल. मुंबईकरांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

- विनायक ढाकणे, पोलिस उपायुक्त, वाहतूक

मुंबईत रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात मुंबई पोलिस कधी आदेश काढणार आहेत? आमचे जवळजवळ तीन-तीन तास वाहतुकीत जातात, त्याबद्दल पोलिस काही करणार आहेत का?

- कुमार चांडक, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com