
Sharad Pawar on MPSC: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशावर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले...
मुंबई : एमपीएससीच्या परीक्षा पॅटर्नचा बदल हा २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) घेतला. यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. यावर आता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. (Sharad Pawar comment on success of the MPSC students agitation)
शरद पवार यांनी फेसबूक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणतात, "तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आलं आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही भविष्यात राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!"
दरम्यान, शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रात्री उशीरा भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते देखील होते. यावेळी त्यांनी फोनवरुन संबंधितांशी संपर्कही साधला होता. यामुळं काही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं पण काही ठाम होते. त्यामुळं या विद्यार्थ्यांमध्ये फूट पडल्याचंही बोललं जात होतं.
यानंतर आज सकाळी आयोगानं अभ्यासक्रमाचा नाव पॅटर्न २०२५ पासून लागू होईल, अशी अधिकृत घोषणा केली. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं, यानंतर या विद्यार्थ्यांनी जल्लोषही केला.