फेरीवाल्यांकडून शिवसेना करतेय वसुली; मनसेचा घणाघात

मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांचा शिवसेनेवर आरोप
 MNS Dombivli city
  Manoj Gharat
MNS Dombivli city Manoj Gharatsakal

डोंबिवली : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे. केवळ फेरिवाल्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना अभय देणारे पालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना यांच्याविरोधात डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. गेले 25 वर्षे पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, परंतू त्यांना अद्याप फेरिवाल्यांचे नियोजन करता आले नाही. डोंबिवलीत पश्चिमेला वेगळी परिस्थिती तर पूर्वेला वेगळी परिस्थिती आहे. कारण यांच्या आर्थिक नाड्या या सत्ताधारी शिवसेना व अधिकाऱ्यांच्या हातात आहेत. असा आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी फेरिवाल्यांच्या प्रश्नावरुन शिवसेनेवर केला आहे. पालिका प्रशासनासही त्यांनी धारेवर धरले असून डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरातील 150 मीटर परिसर फेरिवाला मुक्त करा अन्यथा मनसे मैदानात उतरेल असा इशारा मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी यावेळी दिला.

डोंबिवली स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरिवाले बसत असून त्यांच्यामुळे या परिसराची बजबजपूरी झाली आहे. रेल्वे स्टेशन परिसर फेरिवाला मुक्त करा, 150 मीटरच्या आत फेरिवाले बसता कामा नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही त्याची अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. डोंबिवली शहरात तर पश्चिमेला वेगळे चित्र व पूर्वेला वेगळे चित्र पहायला मिळत आहे. पश्चिमेला 150 मीटरच्या आत एकाही फेरिवाल्याला बसू दिले जात नसताना हा नियम पूर्वेला का लागू नाही असा सवाल शहराध्यक्ष घरत यांनी करत यांच्या आर्थिक नाड्या या सत्ताधारी शिवसेना व पालिका अधिकाऱ्यांच्या हाती असल्याचा आरोप घरत यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी शहर सचिव अरुण जांभळे, संदिप म्हात्रे हे उपस्थित होते. पूर्वेला ग आणि फ प्रभाग असून या ठिकाणच्या प्रभाग अधिकाऱ्यांची बदली करून एकाच प्रभाग अधिकाऱ्याकडे दोन्ही प्रभागाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ते एवढे सक्षम अधिकारी आहेत की ? की हे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी हे हप्ते वसुली जोरात करतात म्हणून त्यांची पुन्हा येथे नियुक्ती करण्यात आली आहे असा सवाल घरत यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना केला आहे.

फेरिवाल्यांना आमचा विरोध नाही, परंतू स्टेशन परिसरातील दिडशे मीटरचा परिसर हा फेरिवाला मुक्त करा ही आमची मागणी आहे. 25 वर्षे येथे शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा यांना नियोजन करता येत नसेल तर केवळ हप्ते खाणे यांचे काम आहे का? पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अधिकारी हे ढिम्म असून थातूर मातूर कारवाई केवळ ते करतात, पुन्हा परिस्थिती जैसे थे असते. स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांविरोधात कारवाई केली नाही तर पुन्हा एकदा मनसेला फेरिवाल्यांविरोधात मैदानात उतरावे लागेल असा इशारा यावेळी मनोज घरत यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com