शूSSS शांतता राखा! , 'त्या' वक्तव्यावरुन शिवसेनेनं भाजपला डिवचलं

शूSSS शांतता राखा! , 'त्या' वक्तव्यावरुन शिवसेनेनं भाजपला डिवचलं

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.  राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची शिवसेनेनं आजच्या अग्रलेखात खिल्ली उडवली आहे.  राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले म्हणजे राज्याचे हित, अन्यथा नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. तसंच भाजपची मगरमिठी स्वीकारली म्हणजेच राज्याचे हित या भ्रमात कुणी राहू नये, असा इशाराही भाजपला देण्यात आला आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राज्यात स्वबळावरील सरकार आणण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश राज्यातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले. भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केलीय. 

विरोधी पक्षाने आक्रमक व्हावं, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केला.

आजच्या अग्रलेखात काय म्हटलंय? 

  • महाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे! नड्डा म्हणतात, ‘‘स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा!’’ त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे!
  • विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.
  • भाजपने आक्रमणाच्या तोफा फक्त महाराष्ट्रातच उडवल्या असे नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांडय़ास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही.
  • नड्डा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणारे त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण केले, पण त्यांनी सत्य सांगितले नाही. ‘‘महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे,’’ असा टोला श्री. नड्डा यांनी मारला. भारतीय जनता पक्ष सध्या जे राजकारण करीत आहे ते असे कोणते परमार्थाचे लागून गेले आहे! 
  • मध्य प्रदेशात त्यांनी सरकार पाडले ते काय संतसज्जनांचा मेळा जमवून नक्कीच पाडले नाही. राजस्थानमध्येही मंत्रोच्चार वगैरे करून तेथील सरकार अस्थिर केले नाही, तर सरळ सरळ पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रावर टीका करण्याआधी हे सत्य स्वीकारले पाहिजे.

Shivsena saamana editorial slams bjp chandrakant patil jp nadda statement mahavikas aghadi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com