मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे आज राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली. मात्र भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकूमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली, असेही थोरात यांनी म्हटले आहे. भाजपशासित राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. "बेटी बचाओ'चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून आहेत. कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी (ता.5) राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हा सत्याग्रह केला जाणार आहे, अशी माहितीही थोरात यांनी यावेळी दिली.
उत्तर प्रदेश सरकारने लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत पुरुष पोलिस अधिकाऱ्याची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे हेच यातून निदर्शनास आल्याचेही ते यावेळी म्हणाले.
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.