Diva News: दिवा शहरातील जवळपास 90% वाहतूक व्यवस्था ही रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर पध्द्तीनुसार रिक्षा भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले.
ज्याची अंमलबजावणी दिनांक २१ एप्रिल २०२४ पासून करण्यात आलेली आहे. रिक्षा युनियनकडून करण्यात आलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला विरोध, भाडेवाढीवर नाराजी ही व्हॉट्स ॲप आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवरून दिसून येत आहे. तर रिक्षा युनियनला ही फोन करून व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी ही रिक्षा भाडेवाढीला विरोध दाखवला आहे.
वास्तविक पाहता दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती ही साधारणपणे दिवा रेल्वे स्थानकापासून एक ते साडे तीन किलोमीटरच्या पट्यात पसरलेली आहे. उदा. दिवा स्टेशन ते आगासन फाटक (3 किमी), दिवा स्टेशन ते बेडेकर नगर (2.1 किमी), दिवा स्टेशन ते गणेश नगर (1.9 किमी), दिवा स्टेशन ते ग्लोबल शाळा (1.6 किमी), दिवा स्टेशन ते दातिवली फाटक (1.7 किमी), दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर- दातिवली (1.5 किमी), दिवा स्टेशन ते साबे जीवदानी मंदिर (1.5 किमी)
प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) ने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मीटर नुसार रिक्षा वाहतुकीचे भाडे पहिल्या दिड किलोमीटर साठी 23 रुपये आकारले जाते. त्यानुसार जर साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळे पर्यंतचे अंतर हे अनुक्रमे 1 किमी आणि 1.6 किमी आहे. नवीन दरानुसार साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत 15 रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीट प्रमाणे त्याचे मूल्यमापन केल्यास रिक्षाचालकला साधारणपणे 45 रु. मिळतात. मार्च 2020 लॉकडाऊन पूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी सीटमागे प्रत्येकी 10 रुपये आकारले जात होते. पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती म्हणून रिक्षा चालकांकडून 10 रुपयांच्या ऐवजी 15 रुपये आकारण्यास सुरवात करण्यात आली. नागरिकांनीही त्यास विरोध केला नाही, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण काळानुरूप जेव्हा परिस्थिती सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे रिक्षा प्रवासी संख्या सुरू करण्यात आली; तेव्हा मात्र रिक्षाचे वाढवण्यात आलेले भाडे तसेच ठेवण्यात आले, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
डोंबिवली स्टेशन पासून रिजेन्सी अनंतम गेट पर्यंत साधारण 20 रुपये शेअर ऑटोचे भाडे आकारले जाते. किलोमीटनुसार पाहायला गेल्यास हे अंतर अंदाजे 3 किलोमीटर आहे. त्या हिशोबाने दिव्यात नक्कीच रिक्षा भाडेवाढ जास्तच असल्याने नागरिक उघडपणे विरोध दाखवत आहेत. तर डोंबिवली सारखे दिव्यातील शेअर ऑटोचे दर देखील आकारले गेल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मीटरनुसार रिक्षा सेवा वाहतूक विभागाने सुरू केल्यास त्याचा फायदा रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही होऊ शकेल, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. ज्यांना शेअर भाडे जास्त वाटत असेल ते मीटर प्रमाणे रिक्षा वापरू शकतील. तर प्रादेशिक परिवहन विभागाने दिव्यातील दोन्ही रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा मार्ग काढण्याची मागणी दिव्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
दिव्यातील शेअर रिक्षांच्या भाडेवाढी वर दिवा मनसेने कडे बऱ्याच तक्रारी आल्या. हा दिव्यातील सामान्य नागरिकांना पडणाऱ्या भुर्दंड कमी व्हावा यासाठी या विषयात मनसेने लक्ष घालून ठाण्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात दिव्यातील शेअर रिक्षा भाडेवाढीवर प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा सुवर्णमध्य मार्ग काढण्याची मागणी दिवा मनसे कडून करण्यात आली आहे. त्यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील आणि शाखाध्यक्ष सागर निकम हे उपस्थित होते.
जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे - जल्हाप्रमुख शेअर रिक्षा भाडेवाढी वर मनसेने आम्हाला ती नियंत्रणात आणण्यासाठी निवेदन देऊन त्यात लक्ष घालण्याची विनंती केली. ते प्राप्त झालेले निवेदन तपासून त्यातील विविध मुद्दे बघून त्यात जर काही नियमबाह्य आढळल्यास त्यावेळी दिव्यात येऊन रिक्षां विरोधात भरारी पथकां व्दारे कारवाई करण्यात येईल.
- वाढती महागाई आणि वाढते पेट्रोलचे दरामुळे रिक्षा वाल्यांना दिव्यात रिक्षा चावताना नेहमी त्रास होत होता. तर आरटीओच्या नवीन नियमामुळे दिव्यातील रिक्षांमध्ये 4 ऐवजी फक्त तीनच प्रवासी भरून वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे ही शेअर रिक्षांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. तरी कोणताही रिक्षावाला 3 प्रवाशां ऐवजी 4 ते 5 प्रवाशी घेऊन स्टँड वरून निघाल्यास त्यावर यनियन तर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल.
विनोद भगत, शिवशक्ती रिक्षा चालक- मालक संघटना - अध्यक्ष
दिवा शहरातील रिक्षा भाडेवाढीमुळे इथल्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडणार आहे. सामान्यतः मिटर रिक्षांचे भाडे जास्त होत असल्यास लोकांना स्वस्त पडावं म्हणून शेअर रिक्षा पद्धत वापरली जाते. पण दिव्यात मात्र शेअर ऑटो पेक्षा मिटर रिक्षा स्वस्त पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर रिक्षांचे दर कमी करता येत नसतील तर प्रशासनाने दिव्यातही मिटर रिक्षा पद्धत सुरू करावी. मग ज्याला जे परवडेल त्यानुसार नागरिक ती रिक्षा सेवा वापरतील.
तुषार भास्कर पाटील, मनसे दिवा शहर, अध्यक्ष -
दिव्यातील सामान्य नागरिक हे हातावर पोट असणारे आहेत. लॉक डाऊन आधी दिवा स्टेशन ते बेडेकर नगर 12 रुपये प्रत्येक व्यक्ती रिक्षा भाडे होते. लॉक डाऊन मध्ये संसर्ग होऊन आजार वाढू नये त्यासाठी रिक्षात फक्त 2 प्रवासी बंधनकारक असल्यामुळे तेव्हा रिक्षा भाडे वाढवून 12 च्या ऐवजी 15 करण्यात आले होते. त्यांनतर ते तसेच ठेऊन आता पुन्हा रिक्षा भाडेवाढ करून 15 रुपयांवरून ती 20 रुपये करण्यात आली. ही अशी चुकीची भाडेवाढ योग्य नाही. प्रत्येकालाच एव्हढे पैसे द्यायला जमणारे नाही. ही भाडेवाढ रद्द करण्यात यावी.
राकेश साळुंखे, बेडेकर नगर, नागरिक -
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.