
फेब्रुवारीच्या २६ दिवसांत सात वेळा शून्य मृत्यू
मुंबई, ता. २८ : मुंबई आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. कमी होत असलेला पाॅझिटिव्हिटी दर आणि सतत शून्य मृत्यूंची नोंद यावरून हे स्पष्ट होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाली. कोविडच्या तिसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात २६ दिवसांत सातव्यांदा कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. यासह मुंबईतील नवीन रुग्णांची संख्या दोन अंकी झाली आहे.
पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले की, नवीन रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे मुंबईचा पाॅझिटिव्हिटी दर ०.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या लाटेत डिसेंबर महिन्यात मुंबईत सात वेळा शून्य मृत्यू झाले होते. आता तिसऱ्या लाटेतही हाच ट्रेंड दिसून येत आहे. यासह २३ महिन्यांनंतर शनिवारी मुंबईत इतके कमी रुग्ण आढळले आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेत आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तिसऱ्या लाटेत २ जानेवारी २०२२ रोजी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही आणि आता १५, १६, १७, २०, २३, २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
६५०० बेड काढणार...
जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ५४ टक्क्यांनी कमी झाली आहे. पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, नवीन रुग्णांची संख्या कमी असल्याने चार जम्बो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोविड रुग्णांसाठी राखीव बेडमधून सुमारे ६,५०० बेड काढण्यात येणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..