पालीकरांना प्रतीक्षा विकासकामांची
नवनियुक्त नगरसेवकांसमोर अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान
पाली, ता. ३१ (वार्ताहर) : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत होऊन पहिली नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली आहे. आता नवनियुक्त नगरसेवकांसमोर असंख्य समस्या मार्गी लावण्याचे आव्हान आहे.
अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेली पाली नगरपंचायत सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत १७ पैकी तब्बल १० जागांवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आता आघाडीच्या हाती नगरपंचायतीची सूत्रे आली आहेत.
पालीकरांना नवनियुक्त नगरसेवकांकडून मोठ्या अपेक्षा आहे. पाली नगरपंचायतीला वारंवार भेडसावणाऱ्या समस्या आता नक्कीच मार्गी लागणार, अशी स्वप्ने आता नागरिक पाहत आहेत.
मागील वर्षानुवर्षे येथील असंख्य प्रश्न व समस्या जैसे थे आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास हे सर्व प्रश्न आम्हीच मार्गी लावू व खरा विकास आम्हीच करू, अशी आश्वासने प्रचारादरम्यान सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिली आहेत. वास्तवात आता कोणते प्रश्न मार्गी लागतील व विकासकामे होतील हे आता कळणार आहे.
....
पालीतील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. नगरपंचायत प्रस्थापित झाल्यावर हे सर्व प्रश्न व समस्या आता मार्गी लागावेत. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करावीत हीच अपेक्षा आहे.
- ॲड. नरेश शिंदे, तरुण, पाली.
........
या आहेत समस्या
- पालीत तीर्थक्षेत्र विकास आराखडा रखडला.
- रस्ते अरुंद आहेत. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
- कचरा व सांडपाण्याच्या नियोजनाचा अभाव
- नवीन बस स्थानकाला मुहूर्त नाही.
- ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय प्रलंबित
- मासळी मार्केटची दुरवस्था
- पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित.