यशस्वी गिरणी कामगारांची घरांकडे पुन्हा पाठ
मुदतीनंतर केवळ ४ विजेत्यांचे अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत १ मार्च २०२० रोजी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार आणि वारसांनी कागदपत्रे सादर करण्याकडे पुन्हा पाठ फिरवली आहे. मंडळाने दिलेल्या मुदतीत एकाही विजेत्याने कागदपत्रे सादर केली नाहीत. मात्र मुदतीनंतर ४ विजेत्यांनी अर्ज सादर केले असून त्यांची कागदपत्रे स्वीकारायची की नाही याबाबत मंडळ निर्णय घेणार आहे. या सोडतीमधील प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना आता संधी देण्यात येणार आहे.
मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार, वारसांसाठी बॉम्बे डाईंग मिल, स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची संगणकीय सोडत १ मार्च २०२० रोजी काढण्यात आली होती. सोडतीतील विजेत्यांना त्यांनी अर्जात दिलेल्या पत्त्यावर मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात आले. त्यानुसार अर्जदारांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुंबईस्थित शाखांमध्ये कागदपत्रे सादर करण्यासाठी १२ जुलै २०२१ ते ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता; परंतु या दरम्यान अर्जदारांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता मंडळाने दुसऱ्यांदा १० सप्टेंबर २०२१ ते ९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. या कालावधीत देखील बहुतांश गिरणी कामगार, वारस यांनी कागदपत्र सादर केली नसल्यामुळे तिसरी मुदतवाढ देण्यात आली होती.
यानंतर ६१९ विजेत्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीतही विजेत्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत. या मुदतीनंतर केवळ ४ विजेत्यांचे अर्ज मंडळाकडे प्राप्त झाले आहेत. हे अर्ज स्वीकारायचे की रद्द करायचे याबाबत मुख्य अधिकारी निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. विजेत्या अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्याची संधी देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.