निवृत्तीनंतरही प्राध्यापकांना विद्यापीठातील घर सोडवेना
दीड कोटीहून अधिक थकीत वसुलीसाठी विद्यापीठाचे पाऊल
मुंबई, ता. २ : मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापकांना आपण राहत असलेला बंगला, खोल्या काही दिवसांत सोडणे बंधनकारक असते. मात्र काही प्राध्यापकांनी मागील काही वर्षे अनेक प्रकारची वशिलेबाजी आणि आपला रुबाब दाखवत ते सोडलेले नाहीत. त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींहून अधिकची थकीत वसुलीही अडकून पडल्याने मुंबई विद्यापीठाने हा विषय आता गांभीर्याने घेतला आहे.
ज्या प्राध्यापकांनी आपले बंगले, खोल्या सोडलेल्या नाहीत व त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे, अशा निवृत्त प्राध्यापकांकडून त्यांच्या मूळ थकीत रकमेवर दंड लावून ती वसूल केली जाणार आहे. यासाठी नुकताच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला होता. त्यावर सर्व सदस्यांचे याविषयी एकमत झाल्याचे सांगण्यात आले.
मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातून २०१७ मध्ये निवृत्त झालेले प्रा. अभय पेठे यांनी निवृत्तीनंतरही बंगला सोडला नाही. त्यासाठी विद्यापीठाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आल्याने त्यावर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. नील हेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने प्रा. पेठे यांच्याकडून ७५ लाख ८९ हजार ८०० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. पेठे यांनी यापूर्वी सहा लाख ५१ हजार २२५ रुपये विद्यापीठाकडे जमा केले आहेत. त्यामुळे उर्वरित तब्बल ६९ लाख ३८ हजार ५७५ रुपये त्यांच्याकडून घेण्याचा प्रस्तावावर व्यवस्थापन परिषदेत मंजुरी देण्यात आली.
यासोबतच विद्यापीठातून २०१४ मध्ये निवृत्त झालेले प्रा. व्यंकटेश कुमार यांनीही कलिना संकुलातील बंगला अजून सोडला नाही. त्यांच्याकडे ७९ लाख ८० हजार रुपये थकीत आहेत, तर अन्य सहा प्राध्यापक आणि तीन शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अद्याप संकुलातील घर सोडले नाही. या सर्वांकडून भाडे दंडासह वसूल करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
संकुलात ७६ सदनिका, १२ बंगले
विद्यापीठाच्या कालिना संकुलात व्याख्याते, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी विविध प्रकारची निवास व्यवस्था आहे. यामध्ये ७६ सदनिका आणि १२ बंगल्यांचा समावेश आहे. यातच कुलगुरूंच्या बंगल्यांचाही समावेश आहे.
निवृत्तीनंतरही अनेक पदावर
मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांनी आपल्या निवृत्तीनंतरही अनेक पदांवर वशिल्याने ताबा कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ कायद्यातील काही नियमांचा आधार घेऊन ही प्राध्यापक मंडळी पुन्हा अनेक विभागात कार्यरत आहेत. अशा प्राध्यापकांची मोठी यादी विद्यापीठात असल्याचे विद्यापीठातील सूत्रांकडून सांगण्यात आले.