शिवसेनेच्या जत्रोत्सवावर
पालिका प्रशासनाचे मौन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : संपूर्ण राज्यभरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात आहे; मात्र अंधेरीतील डी. एन. नगरातील पालिका मैदानावरील शिवसेनेच्या मालवणी जत्रोत्सवावर पालिका प्रशासनाने मौन पाळले आहे. हा महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात झाला, पण प्रशासनाने काय कारवाई केली, याबाबत प्रशासन स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; तर इतर अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
ओमिक्रॉन आणि कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नियमावली पाळण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील पर्यटन स्थळे नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती; मात्र अशा स्थितीत अंधेरीत शिवसेनेचा मालवणी जत्रोत्सव सुरू होता. याचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता.
...
‘स्वतःच्या घराकडेही लक्ष द्या’
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जत्रोत्सवावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. लोकांना सल्ले द्यावेत, पण स्वतःच्या घराकडेही लक्ष द्यावे, असा टोला भातखळकर यांनी लगावला.
...