न्यायालयीन कोठडी असतानाही ठाण्यातच पाहुणचार?
विनयभंगाच्या गुन्हेगारावर पोलिस अजूनही मेहेरबान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः विनयभंगाचा आरोप असलेला कांदिवली चारकोपमधील आरोपी डॉ. सुधीर शेट्टी याच्यावर अजूनही पोलिस मेहेरबानच असल्याचे समोर आले आहे. ‘सकाळ’ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेट्टीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते; परंतु सध्या त्याचा पोलिस ठाण्यातच पाहुणचार केला जात असल्याचे समजते. त्यामुळे न्यायालयाचा आदेश असतानाही पोलिस आरोपीला मदत का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
२७ डिसेंबरला दोन महिन्यांनंतर डॉ. सुधीर शेट्टीवर चारकोप पोलिसांनी विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुराव्यांची शहानिशा करण्याच्या नावाने तीन दिवस वेळ घेतल्यानंतर ३० डिसेंबरला त्याला अटक केली. त्यानंतर ३१ तारखेला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या पुढच्या तपासासाठी पोलिस कोठडीचीही मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने डॉ. शेट्टीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. १ जानेवारीला तो जामिनासाठी अर्ज करणार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात न करता ठाण्यातच त्याचा पाहुणचार होत असल्याचा आरोप होत आहे. १ जानेवारीला पोलिस ठाण्यातूनच पोलिस त्याला न्यायालयात घेऊन आले. १ जानेवारीला आपल्याला जामीन मिळेल, असा विश्वास सुधीर शेट्टी आणि चारकोप पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यातच ठेवले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
पोलिसांशी संपर्क नाही
झाल्या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी चारकोप पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.