शेतकऱ्यांना रब्बी पिकांचा आधार
अवकाळीचा फटका बसल्यास आर्थिक संकट
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील भात पीक हे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे; मात्र मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसतो आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लावलेल्या भाजीपाल्यावर आर्थिक मदार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे विक्रमगडमधील शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा नाही; मात्र विहीर, नदी-नाले यातील उपलब्ध पाण्यावर येथील शेतकरी रब्बी हंगामात पालेभाज्या पिकवतात. विक्रमगड तालुक्यातील कावळे, शेलपाडा, विक्रमगड, माण, नागझरी, वसुरी, डोल्हारी, दादडे, तलवाडा आंबिवली, कुंर्झे, आंबेघर आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात रब्बी पीक घेतले जाते. येथील शेतकरी कारली, दुधी, मिरची, गवार, वांगी, टॉमॅटो, कोबी, प्लॉवर, भेंडी, सिमला मिरची, चवळी, काकडी, माठ, भोपळा, मेथी, चवळी अशा पालेभाज्या घेतात.
सध्यस्थितीत मेथी, शेपू व पालक या भाज्यांची आवक विक्रमगडच्या बाजारात वाढली आहे.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भाजीपाला तयार होऊन विक्रीयोग्य होत असतो. भाजीपाला पिकवण्यासाठी योग्य वेळी पाणी देणे गरजचे असते.
- विजय सांबरे, शेतकरी, ओंदे गाव
शेतकरी मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकवत आहेत; मात्र विक्रमगड तालुक्यात मोठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही.
- सोपान दिघे, शेतकरी, मुहू गाव
विक्रमगड ः शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला.