शिवसेनेची कामे मतदारांपर्यंत पोहोचवा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका; तर शिवसेनेने महापालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार या महापालिकांसह राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दृकश्राव्य माध्यमातातून शिवसेना नेते आणि मुंबईतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (ता.४) चर्चा केली. यावेळी ठाकरे कुटुंबीयांवर होत असलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला; मात्र आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात अडकून न राहाण्याचा सल्ला ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आमच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तरे देण्यात वेळ घालवू नका. ते काम आम्ही करू. शिवसेनेने महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवा, असे निर्देश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोविड काळातील कामांचाही ठाकरे यांनी आवर्जून उल्लेख केला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपने शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली होती. यंदाही भाजप पूर्ण शक्ती लावून ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर असलेले वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आव्हान यंदा शिवसेनेसमोर आहे.
----
सध्याचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ
- एकूण नगरसेवक - २२३ (चार जागा रिक्त)
-शिवसेना - ९७
-भाजप-८३
-कॉंग्रेस - २९
-राष्ट्रवादी कॉंग्रेस - ८
-समाजवादी पक्ष - ६
-मनसे - १
-एमआयएम-२