इंटरनेटच्या महाजालात तरुणाई गुरफटतेय... सायबर गुन्ह्यांमध्ये तरुणाईचा सर्वाधिक सहभाग

इंटरनेटच्या महाजालात तरुणाई गुरफटतेय... सायबर गुन्ह्यांमध्ये तरुणाईचा सर्वाधिक सहभाग

इंटरनेटच्या महाजालात तरुणाई गुरफटतेय... ऑनलाईन गुन्ह्यांत तरुणांचा सहभाग सर्वाधिक रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ ः सध्या `बुलीबाई` ॲप प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तरुण-तरुणी पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतले आहेत; परंतु गेल्या काही दिवसांत सायबर गुन्ह्यांची प्रकरणे आणि त्यातील आरोपींचा वयोगट पाहिल्यास तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात यात गुरफटत चालल्याचे वास्तव समोर येत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात तरुणाई इंटरनेटच्या महाजालात गुंग होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. बुलीबाई ॲपवरून मुस्लिम महिलांना लक्ष्य केले जात असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे आली. त्यानंतर मुंबईच्या सायबर पोलिसांनी ३ जानेवारीला बंगळुरूहून पहिला आरोपी विशालकुमार झा (२१) याला ताब्यात घेतले. ४ जानेवारीला उत्तराखंडमधून श्वेता सिंग (१८) या तरुणीला अटक केली. बुधवारीही (ता. ५) उत्तराखंडमधून आणखी एका तरुणाला अटक केली. मयांक रावत (२१) असे या तरुणाचे नाव आहे. हे तिन्ही तरुण सुशिक्षित टेक्नोसॅव्ही आहेत. विशालकुमार हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतोय, श्वेता सिंग १२ वी विज्ञानमध्ये उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीची तयारी करत आहे, तर मयांक रावत हाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या महिन्यात विराट कोहलीच्या मुलीला धमकी देणारा आरोपी २३ वर्षांचा होता. मुंबईच्या सायबर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये झारखंडहून अनेकांची फसवणूक करणारे एक रॅकेटही उद्ध्वस्त केले. त्यातील आरोपीही २० ते २२ वयोगटातले होते. झारखंडमध्ये तर गावातले जवळपास सगळे तरुण अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे चित्र आहे. अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये लोकांना फसवणारे आरोपी हे २० ते २५ या वयोगटातील असतात. ही मुले सुशिक्षित, चांगल्या कुटुंबातील, आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या घरांतून आलेली असतात. तंत्रज्ञान कोळून प्यायलेली ही मुले त्याचा चुकीचा वापर का करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना कुणीतरी गाईड करतो... सायबर गुन्ह्यांमध्ये तरुण आरोपींची संख्या सर्वात जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लवकर आणि झटपट पैसे मिळवण्याच्या नादात हे तरुण अशा प्रकारचे गुन्हे करतात. बुलीबाईसारख्या प्रकरणात जिथे धार्मिक समुदायाला `लक्ष्य` केलेले असते, तेव्हा यात सर्व दोष या तरुणांचा नसतो. त्यांना कुणीतरी गाईड केलेले असते किंवा पैशांचे प्रलोभन दाखवलेले असते. कदाचित दबाव टाकून त्यांच्याकडून अशी कामे करून घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. लहानपणापासूनच तंत्रज्ञान माहीत असलेली तरुण मुले, त्यांना कष्ट न करता त्यांची स्वप्न पूर्ण करायची असतात. झटपट पैसा कमवून आरामदायी आयुष्य जगायचे असते, तेव्हा हे तरुण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी करतात. ही तरुण मुले जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे करतात, तेव्हा ते हळूहळू छोट्या-मोठ्या चुकीच्या गोष्टी करायला लागतात, मग मोठा गुन्हा करतात. असे गुन्हे करण्यातले धोके त्यांना माहीत असतात, पण त्यांच्या मनाची तयारी झालेली असते. या मुलांना शिक्षा झाली तरीही ही मुले पुन्हा असे गुन्हे करणार नाहीत, याची कुणीही शाश्‍वती देऊ शकत नाही. - डॉ. विभावरी पाटील, मानसोपचार तज्ज्ञ. सायबर विश्वातील अराजकता आणि झटपट पैसे कमावण्याच्या लालसेमुळे तरुणांचा असा विश्वास आहे, की पोलिस त्यांना पकडू शकत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास आणि आपल्या कायद्यातील त्रुटी, तसेच कायद्याच्या मर्यादा यामुळं सायबर गुन्हे सिद्ध होणे आणि आरोपींना शिक्षा मिळण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. नागरिकांमध्ये सायबर क्राईम म्हणजे काय, याबद्दल जनजागृती करणे हाच अशा पद्धतीचे गुन्हे थांबवण्यावर उपाय आहे. - ॲड. प्रशांत माळी, सायबर कायदे तज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com