वयाच्या पन्नाशीनंतर तिकीट नाही
उमेदवारांवरही कोविडची छाया; पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यानुसार मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे; परंतु कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने निवडणुकीबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना, मुंबई पालिकेची कारभारी असलेल्या शिवसेनेने `युवा कार्ड` खेळत वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांना यंदा उमेदवारी न देण्याच्या विचाराधीन असल्याचे समजते. त्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेतून आता नगरसेवक तयार करण्याचा विचार पुढे आला आहे. जास्तीत जास्त उमेदवार हे युवा सेनेतून असणार आहेत.
कोविड काळात सर्वाधिक धोका वयाच्या ५०चा टप्पा पार करणाऱ्या नागरिकांना आहे. या नागरिकांचे लसीकरणही प्राधान्याने सुरू करण्यात आले होते. तसेच, त्यांच्यासाठी संपूर्ण राज्यात सर्वेक्षणही करण्यात आले होते. कोविड काळात या नागरिकांच्या सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावरही मर्यादा आल्या होत्या. त्याची छाया आता आगामी निवडणुकीच्या तिकीट वाटपावरही पडणार आहे. त्यामुळे पालिकेतही शिवसेनेने `युवा कार्ड` खेळण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
गेल्या दोन लाटांमध्ये पन्नाशीपुढील कोरोनाबाधितांना अधिक त्रास झाला. त्यात सहव्याधी असलेल्या अनेकांचा मृत्यू झाला. पन्नाशी ओलांडलेल्या इच्छुकांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेने भूमिका बदलली आहे. मात्र, यात काहीजण अपवादही ठरू शकणार आहेत. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या इच्छुकांना या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीट देताना विचार करण्यात येणार आहे. शक्यतो अशा इच्छुकांना तिकीट देऊ नये, असा विचार शिवसेनेत पुढे येत असल्याचे समजते.
--------
`टीम आदित्य`साठी पावले
पन्नाशी ओलांडलेले विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी हे प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फळीतील आहेत. आदित्य ठाकरे यांनी आपला भार हलका केला असल्याचे काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता संसदीय राजकारणाची पहिली पायरी असलेल्या महापालिकेत आदित्य यांची टीम तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पन्नाशीपुढील इच्छुकांना बाजूला ठेवून युवा सेनेला प्रामुख्याने स्थान देण्याचा विचार पुढे आला आहे.
युवा सेनेला वाटा, नंतर अन्य?
स्थानिय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना, तसेच शिवसेनेशी संबंधित असलेल्या इतर अनेक कामगार संघाटनांमधून अनेक नामवंत नगरसेवक झाले आहेत. काही महापौरांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही शिवसेनेच्या कामगार संघटनेतून झाली आहे. मात्र, आता युवा सेनेला वाटा मिळाल्यानंतरच शिवसेना आणि कामगार संघटनांमधील इच्छुकांचा विचार केला जाणार आहे.
पर्याय नसेल तेथे...
पालिकेतील अनेक नगरसेवक तीन ते चार वेळा निवडून आलेले आहेत. काही जण अनेकदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात काहींच्या पदरी पराभव पडला. कितीही वेळा नगरसेवक म्हणून निवडणूक लढला असला तरी आता उमेदवारी मिळण्यासाठी `वेटिंग`च राहावे लागणार आहे. अशा ज्येष्ठ नगरसेवकांना पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येईल. मात्र, यात काही अपवाद असतील. ज्या प्रभागात पर्याय नसेल तेथे वयाची अट ठेवण्यात येणार नाही, हे निश्चितच आहे.