गृहविलगीकरणातील बाधित
महाराष्ट्रात पाच पटीने वाढले
१५ दिवसांत संस्थात्मक अलगीकरणात २९ टक्के वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यभरात गृहविलगीकरणात असलेल्यांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत २९ टक्के नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, केंद्राने बुधवारी (ता. ५) गृहविलगीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करून, त्याचा कालावधी १० वरून सात दिवसांवर आणला आहे.
राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणात असलेल्यांनाच वाढलेल्या रुग्णसंख्येसाठी कारणीभूत ठरवले आहे. त्यापैकी बहुतेक लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. परिणामी तेच गृहविलगीकरणात आहेत. गृह विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे आरोग्यतज्ज्ञांनी मात्र स्वागत केले आहे.
राज्य कोविड अहवालानुसार २१ डिसेंबरपर्यंत ७३,०५३ जण गृहविलगीकरणात होते; परंतु ४ जानेवारीपर्यंत ती संख्या ३,९८,३९१ वर पोहोचली. त्याच कालावधीत ८६४ संस्थात्मक अलगीकरणात होते. ती संख्या आता १,१४० वर पोहोचली आहे. ‘आम्ही सध्या केंद्राने जारी केलेल्या नवीन डिस्चार्ज पॉलिसीचे पालन करत आहोत. त्यामुळे होम आणि संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये अनुक्रमे ४४५ टक्के व २९ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक गरज असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी याची मदत होते. सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की होम क्वारंटाईनमधील बाधितांची संख्या वाढली आहे यात शंका नाही. कारण दोन आठवड्यांत कोविड रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात ९० टक्क्यांहून अधिक लक्षणे नसलेले आहेत. बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात असल्याने गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या जास्त आहे. असे रुग्ण तीन ते चार दिवसांत बरे होत असल्याचे दिसून आले आहे. आम्ही बहुतेक रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवत आहोत. त्यांना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले जात आहे. मुंबईत ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. केवळ १० टक्के रुग्णांना रुग्णालयीन उपचारांची गरज आहे.’
गृहविलगीकरण सात दिवसांवर
केंद्राने सौम्य आणि लक्षणे नसलेल्यांच्या गृहविलगीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अशा रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून किमान सात दिवस उलटून गेल्यावर आणि सलग तीन दिवस ताप नसल्यास ते आयसोलेशनमधून विलगीकरणातून बाहेर पडू शकतात. त्यांना मास्क घालणे गरजेचे आहे. गृहविलगीकरण कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
-
सात दिवसांनंतरही प्रसाराची शक्यता
असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सचे माजी अध्यक्ष डॉ. दीपक बैद म्हणाले, ‘गृहविलगीकरणाचा कालावधी सात दिवसांपर्यंत कमी करणे स्वागतार्ह आहे; परंतु नागरिकांनी काळजी घ्यायलाच हवी. बरे झाल्यानंतरही मास्क लावयला हवा. कारण रुग्णाकडून सात दिवसांनंतरही विषाणूचा प्रसार होऊ शकतो.’