पालघर जिल्ह्यात गुरांची तस्करी
शेतकऱ्यांची ८०० गुरे चोरीला
पालघर, ता. ८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या व दूध व्यावसायिकांच्या गुरे तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जनावरांना गुंगी देऊन चोरट्या मार्गाने गुरांची तस्करी केली जात आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांत जवळजवळ आठशे गुरांची चोरी झाली आहे. त्याचा अजूनही शोध लागत नाही, असा आरोप खासदार राजेंद्र गावित यांनी पोलिस अधीक्षकांसोबतच्या बैठकीत केला. तसेच पालघर जिल्ह्यात अवैध धंदे जोरात सुरू असताना पोलिस प्रशासन काय करत आहे, असा सवालही गावित यांनी विचारला. पालघर जिल्ह्यातील ७० ते ८० पशुपालकांनी आपल्या गोठ्यातून गाई व बैल चोरीला गेल्याची तक्रार बैठकीत केली. तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये गेलो असता पोलिस सहकार्य करत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पालघर जिल्ह्यातील गाई व गुरे चोरीला जाण्याचा प्रकार गंभीर असून या प्रकरणात पोलिसांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक पोलिस ठाण्याला तशा सूचना द्याव्यात, अशा सूचना खासदार गावित यांनी अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांना या बैठकीत पशू पालकांसमोर केल्या.
पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय चालत आहे. या व्यवसायावर येथील शेतकऱ्यांचे पोट व उदरनिर्वाह चालतो. अशा वेळेला त्यांची गुरे चोरीला गेल्यास त्यांच्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, या गंभीर प्रश्नाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे गावित यांनी म्हटले. भविष्यामध्ये गुरे चोरणाऱ्या टोळ्या अशाच सक्रिय राहिल्यास किंवा पशुपालकांना पोलिसांनी सहकार्य न केल्यास जिल्ह्यातील पशुपालक एकत्रित येऊन आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार
गुरे चोरी, गो हत्या व मांस वाहतूक तसेच विक्री विरोधात पोलिस धडक कारवाई करत असून यासह दरोडे गुन्हे दाखल करणे, ३०७ खुनाचा प्रयत्न करणे असे सह कलम ही पोलिस लावत असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षकांनी सांगितले. गुरे चोरी रोखण्यासाठी कायद्यानुसार ग्राम सुरक्षा दल स्थापन करून या दलामध्ये दहा तरुणांचा समावेश केला जाईल. त्यांना पोलिस खात्यामार्फत प्रशिक्षण दिले जाईल, असे अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.