रिक्षाचालकांकडून पुन्हा भाडेवाढ
वाहतूक पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच आरटीओच्या खोट्या नियमावलीचा आधार घेत रिक्षाचालकांनी दोन प्रवाशांची परवानगी असल्याचे भासवत पुन्हा टाळेबंदी काळातील वाढीव भाडे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. तशा आशयाचा फलक देखील लावला. मात्र, ही गोष्ट आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना चांगलाच दम भरत नियमाचे पालन करण्यास भाग पाडले.
कोरोना नियम शिथिल झाल्यानंतर शेअर पद्धतीने प्रवासी आणि प्रवासी भाडे घेण्यावरून रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात वादावादी सुरू आहे. आरटीओने सुधारित शेअर रिक्षाभाडे दर लागू केले असताना देखील काही रिक्षाचालक हे अद्यापही मनमानी पद्धतीने दोन प्रवासी आणि वाढीव भाडे आकारत आहेत. प्रवासी मात्र आता अशा रिक्षातून प्रवास न करता त्यांची तक्रार थेट आरटीओ कार्यालयात करू लागले आहेत. यामुळे रिक्षाचालक काहीसे नरमले असून त्यांनी प्रवाशांची जशी मागणी असेल तसे शेअर पद्धतीने भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, टाळेबंदी काळातील वाढीव भाड्यानुसार रिक्षा भाडे मिळावे यासाठी रिक्षाचालकांचा आटापीटा सुरूच असल्याचे दिसते. काही रिक्षा थांब्यावर झळकविण्यात आलेले शेअर भाडे दरपत्रकाचे फलक रिक्षाचालकांनी उखडून टाकले आहेत. प्रवासी भाडे ओळखून त्यांना वाढीव भाडे सांगणे, दोनच प्रवासी बसवितो सांगणे, शेअर नाही डायरेक्ट रिक्षा बोलून प्रवासी बसवून त्यांच्याकडून पूर्ण भाडे घेणे, असे अनेक प्रकार रिक्षाचालकांचे सुरू आहेत.
‘तो’ फलक हटवण्याची सूचना
रिक्षाचालक रुग्ण संख्या वाढल्याने पुन्हा दोनच प्रवासी केवळ रिक्षात बसविले जाणार असे सांगून पुन्हा प्रवाशांची लूट करू पाहत आहेत. डोंबिवली पूर्वेतील एका रिक्षा थांब्यावर तर रिक्षाचालकांनी फलकावर सूचना लिहून तो फलक रिक्षा थांब्यावर लावला. एवढेच नाही तर चक्क आरटीओनेच असे आवाहन केले असून आरटीओची सूचना असलेला कागदही या फलकावर लावला. जागरूक नागरिकांनी याविषयी आरटीओकडे विचारणा करताच आरटीओ अधिकाऱ्यांनी त्वरित जाऊन कारवाई करत या फलकावरील सूचना हटविण्यास रिक्षा चालकांना भाग पाडत नियमांचे पालन करा, असा सज्जड दम देखील दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप रिक्षाचालकांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. रिक्षातून शेअर पद्धतीने ठरलेल्या दरानुसार तीन प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. एका रिक्षा थांब्यावर दोन प्रवाशांना परवानगीची सूचना असलेला फलक लावण्यात आल्याचे समजताच त्याची चौकशी करून तो फलक त्वरित हटविण्यात आला आहे.
- उमेश गित्ते, पोलिस निरीक्षक, डोंबिवली उप वाहतूक विभाग.