पनवेलमध्ये गंभीर रुग्ण कमी
५९५६ पॉझिटिव्ह; २२५ रुग्ण उपचाराधीन, तर ५७३१ गृहविलगीकरणात
वसंत जाधव/ सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता.९ गेल्या आठ दिवसांत कोरोना बाधित रुग्णांचा आलेख पनवेलमध्ये नव्हे तर राज्यभरात उंचावला आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तपासणी करणे व त्वरित उपचार करून घ्यावे असे आवाहन पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
नाताळच्या सुट्या, पर्यटन स्थळावरील गर्दी, लग्न समारंभांसह राजकीय, सार्वजनिक कार्यक्रमांना झालेली गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीत नियमांची पायमल्ली झाल्याने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणे, सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न केल्याने संसर्ग वाढत असून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
२७०७ उपलब्ध खाटा
पनवेल पालिका क्षेत्रात आजमितीस इंडिया बुल मध्ये २००० खाटा उपलब्ध आहेत. सीसीआय कळंबोलीत ६३५ तर कळंबोलीत ७२ अशा पनवेल पालिका क्षेत्रात एकूण २७०७ खाटा उपलब्ध आहेत. तर पालिका क्षेत्रातील एकूण ४६ खासगी रुग्णालयांना उपचारास परवानगी दिली आहे.
उपलब्ध खाटांची संख्या
ऑक्सिजन - पालिका ६८४, खासगी ९९५
व्हेंटिलेटर - पालिका ९४, खासगी १०८
आय सी यु - पालिका ९४, खासगी २३२
चाचण्या वाढवल्या, पॉझिटिव्हीटी दरही वाढला
डिसेंबर महिन्यात आटोक्यात येत असलेला कोरोना संसर्ग हा केवळ बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे पॉझिटिव्हीटी दरही वाढला आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास तपासणी करणे योग्य आहे.
ओमीक्रॉनचा एकही रुग्ण नाही
परदेशातून आलेले ओमीक्रॉन बाधित ११ रुग्ण पालिका क्षेत्रात होते, उपचारानंतर ते बरे झाले आहेत. महापालिकेला मृत्यूदर कमी करण्यातही यश आलेय. मात्र कोरोना वाढीचा आलेख रोखण्यासाठी नियम पाळणे हेच अधिक हितकारक असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांनी सांगितले.
प्रत्यक्ष रुग्णालयात २२५ रुग्ण
महापालिका क्षेत्रात आजमितीस कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण संख्या ५९५५ एवढी आहे. यामध्ये प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या २२५ आहे. सौम्य लक्षणे असलेले बाधितांत गृहविलगीकरणात आहेत. ही स्थिती गंभीर नसली तरी पुढील काही महिने मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे.