साधने उपलब्ध झाल्यानंतर विकासाला गती मिळते
सुनील तटकरे ः रोहा-नागोठणे येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः रोहा-नागोठणे मार्गावरील अष्टमी रेल्वे क्रॉसिंग नंबर ५७ येथील उड्डाणपूल उभारणीचे भूमिपूजन रविवारी (ता. ९) खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. या उड्डापुलासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला. या प्रकल्पासाठी एकूण ३० कोटी रुपये खर्च येईल असे तटकरे म्हणाले. आता मुंबईपर्यंत जाणारी लोकल सेवासुद्धा कोकणातून सुरू होईल असेही तटकरे म्हणाले. या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, मधुकर पाटील, विजय मोरे, विनोद पाशीलकर, पं. स. सदस्या राजश्री पोकळे, पिंगळसई सरपंच शारदा पाशीलकर, नगरसेवक महेंद्र गुजर, मयूर दिवेकर, अहमद दर्जी, महेश कोलाटकर, आप्पा देशमुख, अनंत देशमुख, नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण महाले, संदीप चोरगे, नवनीत डोलकर, नरेश देशमुख, प्रसाद देशमुख, मयूर खैरे, रवींद्र चाळके, सोपान मोहिते यांच्यासह महारेल्वेचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर पी. के. जयस्वाल, रेल्वे मॅनेजर सचिन घुडे आदी उपस्थित होते.
या वेळी तटकरे म्हणाले, की दिवंगत समाजवादी नेते मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नांनी कोकणात रेल्वे मंजूर झाली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी कोकण रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेला. त्या वेळी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झाली. तत्कालीन इंजिनअर श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली अभियांत्रिकी विभागाने आव्हानात्मक असा हा मार्ग पूर्ण केला; मात्र ही वाढती वाहतूक नागरिकांना सतत फाटक बंद असल्यामुळे डोकेदुखी ठरत होती. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाराष्ट्र रेल पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. रेल्वे बोर्डाचे चेअरमन ए. के. जयस्वाल यांच्याकडे रोहा तालुक्यातील अष्टमी व पडम येथील या समस्येवर मार्ग निघावा यासाठी खासदार म्हणून दिल्लीत सतत बैठका घेतल्या. त्या वेळी निधीची तरतूद रेल्वेला करणे शक्य नसल्यामुळे याला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महा रेल महामंडळाची स्थापना करत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी प्राधान्याने अष्टमी येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्याचा ५० टक्के निधी उपलब्ध केला. एकूण ३० कोटी रुपये या कामासाठी खर्ची पडणार आहेत. रेल्वे सेवा आली, आता मुंबईपर्यंत जाणारी लोकल सेवा सुरू होईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
---
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, की गेली कित्येक वर्षे नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येला खासदार तटकरे यांनी पाठपुरावा करत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले. नववर्षाच्या सुरुवातीस हे काम सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त करत हे काम मुदतीत व दर्जेदार कसे होईल यासाठी प्रशासन व ठेकेदार यांनी प्रयत्न करावेत व यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. एकूणच रोहा- नागोठणे- अलिबाग मार्गावरील प्रवासी, रोहे शहरात येणारे ग्रामीण भागातील नागरिक, कामगारवर्ग यांना हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.