५० टक्के क्षमतेने शाळा उघडा
आॅनलाईनमुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांची मागणी
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. १० देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. मुंबईसह राज्यात ५० टक्के क्षमतेने हॉटेल, मॉल, सलून, जिम, चित्रपटगृह सुरू ठेवण्यात आले आहेत, मात्र नुकत्याच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. आॅनलाईन पद्धतीत शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त करीत ५० टक्के क्षमतेने शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.
तिसरी लाट अधिक तीव्र असल्याने शासनाने गर्दी कमी करण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यात शाळा व कॉलेजदेखील १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी माध्यमाच्या बऱ्याच विद्यार्थांकडे मोबाईल नसल्याने ती ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. अनेक कारणांनी ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे अभ्यास होत नसल्याचे विद्यार्थांनी सांगितले. शिक्षणाची दारे बंद ठेवली तर देशाला भविष्यात डॉक्टर, पोलिस, तज्ज्ञांची कमतरता भासणार नाही का, शिक्षण महत्त्वाचे की हॉटेल- मॉल, असा सवाल करत एका विद्यार्थाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट तीव्र असली तरी देशात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचेदेखील लसीकरण होत आहे. गर्दीच कमी करायची असेल तर इतर मार्गे आहेत, मात्र शिक्षण बंद ठेवून काय सिद्ध होणार आहे, असा सवाल करत ५० टक्के क्षमतेने शिक्षण सुरू ठेवा, आम्ही नियमांचे पालन करू, पण आम्हाला शालेय शिक्षणापासून वंचित ठेवू नका, अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे.
...
कोरोनाचा कहर सुरू आहे, मान्य आहे, पण गर्दीचे कारण ठरवून शाळा व कॉलेज बंद ठेवणे हे योग्य नाही. सर्व विचार करून जसे ५० टक्के क्षमतेने सरकारने सगळे काही सुरू ठेवले आहे, त्यप्रमाणे शाळा-कॉलेज सुरू ठेवावीत.
- समीक्षा साळवे, विद्यार्थिनी.
...
कोरोनावर लसीकरण हा उपाय सुरू असताना पुन्हा भीतीने शाळा, कॉलेज बंद ठेवले जात असेल तर त्यात आमचे शैक्षणिक नुकसान आहे. आम्ही लसीकरणासाठी पुढे येत आहोत. कोरोनाच्या लाटा अशाच वाढत राहिल्या तर आमचे मोठे नुकसान होईल.
- महेश कांबळे, विद्यार्थी.
...
ऑनलाईन शिक्षणाचा खरेच कंटाळा येतो. कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो. ऑफलाईन शिक्षणामुळे बरेच प्रश्न सोडवता येतात. मित्र वा शिक्षकांकडून ते सोडवता येतात. ऑनलाईनमध्ये काहीच करता येत नाही.
- ओमकार गाडगे, विद्यार्थी
...
सर्व बाबींचा विचार करता शाळांना ५० टक्के क्षमतेने प्रत्यक्ष वर्ग चालवण्यास परवानगी मिळणे आवश्यक आहे, असे वाटते. शासनाच्या नियमानुसार ४०० चौरस फुटांच्या वर्गखोल्यांची आवश्यकता असताना आमच्याकडे प्रत्येक वर्ग खोली किमान ६३४ चौ. फुटांची आहे. त्यामुळे वर्गात दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आम्हाला सहज शक्य आहे. सरकारने याबाबत विचार करणे आवश्यक आहे.
- शरद फाटक, अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था, घाटकोपर.
...