पटणी मार्गावरील संत निरंकारी महाराज शिल्पाला विरोध
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकालगत आणि नवी मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पटणी रस्ता (ऐरोली नॉलेज पार्क) परिसरातील मुख्य चौकात संत निरंकारी मिशनचे प्रमुख सदगुरू हरदेव सिंहजी महाराज यांच्या नावे प्रबोधन शिल्प साकारण्यात आले आहे. मात्र या शिल्पाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच आंदोलन करीत निरंकारी महाराजांचे शिल्प हटवून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.
२००५ ते २०१४ या कालावधीमध्ये दरवर्षी सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा सत्संगचा कार्यक्रम ठाणे-बेलापूर रोडवरील पटनी कंपनीच्या मैदानात भव्य स्वरूपात साजरा होत होता. या परिसरात निरंकारी मिशनचे अनेक अनुयायी आहेत. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आयुक्तांना लेखी निवेदन देऊन निरंकारी महाराजांच्या नावे शिल्प बांधण्याची मागणी केली होती. शिल्पाच्या कामाचे भूमिपूजन २६ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
‘एन’ आकाराच्या शांतीच्या संदेशात्मक शिल्पाचे काम काम पूर्णत्वास आले असून येत्या काही दिवसांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु उद्घाटनापूर्वीच शिल्पाला विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
रोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे एकही शिल्प उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या दिघा परिसरातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महापुरुषाचा सन्मान महापालिकेने करावा अन्यथा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रूपेश हाटे, राजेश भालेराव, सागर सोनकांबळे, नितीन बनसोडे, अनिल अंगरख, योगेश शिंदे, संजय वाघ, जितेश धाकडे, रंगनाथ घुसळे आणि छत्रपती संभाजी महाराज रिक्षा चालक संघटनचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ः