मुंबईतील किल्ले कात टाकणार
पुरातत्व संचालनालयातर्फे जतन व संवर्धन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. ११ : मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील एकूण सहा किल्ल्यांच्या विकासाबरोबरच त्यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्त्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे या ६ किल्ल्यांच्या विकासाबाबतचा सविस्तर आराखडा यापूर्वी तयार करण्यात आला आहे. हा आराखडा शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबवण्याचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील किल्ल्यांच्या विकासासंदर्भात ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालक डॉ. तेजस गर्गे, अजिंक्यतारा कन्स्ल्टंटचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले हे किल्ले राज्य पुरातत्व संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरातील सहा किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार असून या कामासाठी बाह्यसंस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. या कामामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाबरोबरच दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग आणि मुंबई महापालिका यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या कामासाठी पुरात्तव संचालकांनी पुढाकार घेऊन समन्वयासाठी एक समिती स्थापन करुन या संदर्भातील कामाचे नियोजन करावे. पुरातत्व संचालक यांनी किल्ल्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून किती निधी मिळेल, पर्यटन विभागाकडून याबाबत काय करता येईल, याची माहिती घ्यावी अशा सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत.
सुशोभीकरणावरही भर
मुंबईतील सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच किल्ल्यांच्या ठिकाणी सुविधा निर्माण करणे, किल्ले परिसराचा विकास करणे व किल्ल्यांवर विद्युतीकरण करण्यावरही भर द्यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.