चिमण्यांवरील ‘संक्रांत’ टाळा
स्पॅरोज शेल्टरचे पतंगप्रेमींना आवाहन
धारावी, ता. १३ (बातमीदार) : मकर संक्रांत हा विशेष पुण्यकाल मानलेला आहे. मात्र तो पतंगांमुळे पक्ष्यांच्या जिवावर येतो. म्हणून आनंद साजरा करताना तो पक्ष्यांच्या जिवावर बेतणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन ''स्पॅरोज शेल्टर'' संस्थेने केले आहे.
या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. पतंग उडवताना धारदार मांजा वापरला जातो. अशा धारदार मांजामुळे चिमण्या व अन्य पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांच्या जीवावरही बेतते. यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, असे आवाहन संस्थेने केले आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या आधीच कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पक्ष्यांना वाचवण्याचे प्रयत्न नागरिकांनी केले पाहिजेत. या दिवशी कमीतकमी पतंग उडवून, धारदार मांजाचा वापर टाळून पक्ष्यांना वाचविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.
पतंग उडवताना जखमी होणाऱ्या पक्ष्यांवर उपचार करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या स्वयंसेवकांना पोहोचणे शक्य होत नाही. तेव्हा प्रत्येकाने पतंग उडवताना याची खबरदारी घ्यायला हवी, असे माने यांनी सांगितले.
...
पक्षा जखमी असल्यास कळवा!
चायनीज मांजाला अत्यंत धार असल्याने पक्षी जखमी होण्यासह त्यांचा बळी जाऊ शकतो. केवळ मकर संक्रांतीदिनीच नाही, तर नंतरदेखील वृक्षांना लटकलेल्या मांज्यामध्ये पक्षी अडकून जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना जखमी पक्षी आढळून आल्यास ९८६७६३३३५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रमोद माने यांनी केले आहे.
...