ठाणे पालिकेच्या २७ पैकी २० आरोग्य केंद्रांमध्ये औषध तुटवडा

ठाणे पालिकेच्या २७ पैकी २० आरोग्य केंद्रांमध्ये औषध तुटवडा

ठाणे पालिका आरोग्य केंद्रांमध्ये औषध तुटवडा आपला दवाखान्याचा वैद्यकीय अधिकारीही गायब सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १३ ः एकीकडे कोरोनाचा घेरा, तर दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, तापाच्या साथीने सर्वसामान्य ठाणेकर हैराण झाले असताना पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. पालिकेच्या २७ पैकी २० आरोग्य केंद्रांमध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम यासह अनेक आजारांवरील औषधांचा साठा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी याचा पर्दाफाश केला असून गरजू रुग्णांसाठी उघडण्यात आलेल्या आपला दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारीही गायब असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे शहरात सध्या दररोज दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट असताना सर्दी, खोकला, तापाचे रुग्णही वाढले आहेत. उपचारासाठी खासगी दवाखान्यांबाहेर रुग्णांच्या रांगा लागत आहेत. असे असले तरी खासगी उपचार परवडत नसल्याने पालिकेच्या आरोग्य केंद्रांचा आधार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बहुतेक रुग्णांना बाहेर मेडिकलमधून औषधे घ्यावी लागत आहेत. पालिका आरोग्य केंद्रात औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने त्याची दखल घेत विरोधी पक्षनेता अशरफ ऊर्फ शानू पठाण यांनी कळवा येथील आरोग्य केंद्रात जाऊन औषधांचा साठा तपासला. यावेळी तेथे अत्यल्प साठा असल्याचे दिसून आले. तेथील कर्मचाऱ्यांनी व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, हँडवॉशसह अनेक औषधांचा तुटवडा असल्याची माहिती दिली. याशिवाय मागणीपेक्षा निम्माच साठा सध्या उपलब्ध होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. हीच परिस्थिती कळव्यासह ठाणे, मुंब्रा आरोग्य केंद्रातही असल्याचे यावेळी निदर्शनास आले. ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील २७ पैकी २० आरोग्य केंद्रांत औषधांचा साठाच उपलब्ध नाही. मोठा गाजावाजा करून सुरू केलेला आपला दवाखानाही वैद्यकीय अधिकारी नसल्याने बंद असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. कोट्यवधींचा निधी गेला कुठे? कोरोना साथीशी दोन हात करण्यासाठी ठाणे महापालिकेने सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामांना कात्री लावत कोट्यवधी रुपयांची तरतूद आरोग्यसेवांवर केली जात आहे. असे असताना जर औषधांचा साठा उपलब्ध होत नसेल तर हा कोट्यवधींचा निधी गेला कुठे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लक्ष घालून रुग्णांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आयुक्तांनी सभागृहात उपस्थित राहून उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com