नाल्यांवरील तीन पूल होणार सुरक्षित
दुरुस्तीसाठी पालिकेकडून सहा कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दादर-धारावी नाल्यावरील पुलासह शीव-कोळीवाडा आणि वरळी येथील नाल्यांवरील पूल सुरक्षित होणार आहेत. महापालिका या पुलांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेने शहरातील सर्व पुलांचे ऑडिट केले असून त्यात पुलांच्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे. त्यात या तीन नाल्यांवरील पुलांचाही समावेश होता. या पुलांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत.
दादर-धारावी नाल्यावरील पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम उपनगरातून पूर्व भागात येणारी वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात.
या पुलासोबत वरळी येथील आदर्श नगर आणि शिव कोळीवाडा येथील दिनबंधू नगर नाल्यावरील पुलाचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. हा मार्गही उपनगर आणि शहर विभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या तीन नाल्यांवरील पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी पाच कोटी ५६ लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला आहे. कंत्राट दिल्यानंतर पावसाळा वगळता १५ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
----
रे रोडला पादचारी पूल
रे रोड येथील पादचारी पूल १९२३ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाची काही महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आली; मात्र पुलाचे आयुष्य संपल्याने आता नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पालिकेने तयार केले आहे. पावसाळावगळता १२ महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.