डुकरांपासून शेतीला धोका
लक्ष्मण डुबे
रसायनी : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका रसायनी परिसरातील शेतीला चांगलाच बसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला आहे. हे संकट असतानाच आता डुकरांपासून पिकाला धोका निर्माण होऊ लागला आहे. परिसरात गावातील आणि जंगलातील डुकरे शेतात घुसून कडधान्यांच्या पिकाचे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
परिसरातील वासांबे मोहोपाडा, आपटे, गुळसुंदे, चावणे, वडगाव पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. तसेच दुबार वाल, मूग, हरभरा, चवळी आदी कडधान्याचे पीक घेतात. याशिवाय सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. मात्र, पाच ते सहा वर्षांपासून शेतीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, दाट लोकवस्ती असलेल्या गावातील डुकरे आणि डोंगरालगत असलेल्या रानातील डुकरे शेतात घुसून पीक खात आहेत. काही डुकरे तर शेतीत लोळून आणि ती पायाखाली तुडवून नुकसान करत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
------------------------------
खरीप आणि दुबार भाताचे पीक घेत आहे. खरिपाच्या हंगामात भाताचे पीक चांगले आले होते; मात्र गावातील डुकरांनी सर्व पिकाचे नुकसान केले. कापणीच केली नाही, खर्च वाया गेला. त्यामुळे शेती परवडत नाही. आता दुबार भातपीक घेणार नाही.
- किसन वाळकू मुंढे, चांभार्ली
खरीप आणि रब्बीच्या हंगामात भातपीक घेत आहे. गावातील डुकरे शेतात घुसून नुकसान करत असतात. पीक कापणीला आल्यावर दिवसा आणि रात्री शेताचे राखण करतो.
- महेंद्र धुरव, शेतकरी, वासांबे मोहोपाडा
अवकाळी पावसामुळे कडधान्य पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात थोडे फार कडधान्य आले आहे. त्याचे गावातील डुकरे शेतात घुसून नुकसान करत आहे. पिकाचे संरक्षणासाठी कुंपणाच्या दुरुस्तीचे काम करत आहे.
- विठ्ठल कोडिंलकर, शेतकरी, तुराडे