राज्यात खारफुटीचे क्षेत्र वाढले
मुंबई उपनगरात १.०८ चौकिमी क्षेत्रावर नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : देशातील वन आणि वृक्षसंपत्तीचे मूल्यांकन करणारा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार राज्यात एकंदरीत खारफुटीचे आच्छादन वाढले असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय वन सर्वेक्षणानुसार (एफएसआय) २०१९ पासून राज्यातील खारफुटीच्या कव्हरमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्टच्या अहवालानुसार (आयएसएफआर), एफएसआयचा द्वैवार्षिक अहवाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील खारफुटीचे आच्छादन ३२४ चौरस किमीमध्ये पसरले आहे. त्यात २०१९ पासून चार चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. दुसरीकडे सहा किनारी जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगरात मात्र १.०८ चौरस किलोमीटरच्या खारफुटीचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे.
खारफुटी हे किनाऱ्यावरील जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. शिवाय ते अतिवृष्टी, पूर यांसारख्या तीव्र हवामानाच्या घटनांविरुद्ध नैसर्गिक ढाल म्हणूनही काम करतात. राज्यात खारफुटीचे आच्छादन अतिशय दाट आणि मोठ्या स्वरूपात खुले पसरले आहे. अहवालानुसार, मुंबई शहरात खारफुटीचे आच्छादन दोन चौरस किलोमीटर आहे. मुंबई उपनगरात, ते ६३.२२ चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे. २०१९ मध्ये ते ६४.३० चौरस किलोमीटरपर्यंत खाली आले आहे. संपूर्ण राज्यात, रायगडमध्ये सर्वाधिक १२६.९९ चौरस किलोमीटर पसरलेल्या खारफुटीचे प्रमाण आहे. जे २०१९ च्या तुलनेत ६ चौरस किलोमीटरने वाढले आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्येही रायगडमधील खारफुटीच्या कव्हरमध्ये सर्वाधिक १४.९७ चौरस किमी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र मॅन्ग्रोव्ह सेलच्या माहितीनुसार, स्थानिकांच्या सहभागामुळे खारफुटीचे संरक्षण होण्यास मदत झाली आहे. अहवालात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे खारफुटीचे आच्छादन ठाण्यात आढळून आले असून त्यात ०.९८ चौरस किलोमीटरची घट नोंदवली गेली आहे. सिंधुदुर्गात खारफुटीचे आच्छादन ०.१२ चौरस किमीने घसरले आहे, तर रत्नागिरीत गेल्या दोन वर्षांत ०.१८ चौरस किमीने वाढ झाली आहे. मॅन्ग्रोव्ह सेलने खारफुटीला राखीव जंगल म्हणून अधिसूचित करण्याची आणि खारफुटी म्हणून आरक्षित जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगवान केली. या प्रक्रियेमुळे खारफुटीचा विनाश होण्यापासून संरक्षण करण्यात मदत झाली आहे.
---
सुविधा प्रकल्पांमुळे खारफुटीत घट
राज्य सरकारने २००५ पासून २०२१ पर्यंत १४३.२३ चौ. कि.मी. परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. खारफुटी कक्षाने राज्याच्या वन आणि पर्यावरण विभागाच्या समन्वयाने भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २० अंतर्गत ९८ चौरस किमी खारफुटीचे क्षेत्र राखीव जंगले म्हणून अधिसूचित केले आहे. जिल्ह्यातील खारफुटीच्या जंगल क्षेत्रात घट होण्यास प्रामुख्याने ठाणे महापालिका जबाबदार आहे. कारण त्यांनी खारफुटीवर पाणवठ्याचे सर्व प्रकल्प सुरू केले आहेत. ठाणे-भिवंडी पट्ट्यात, मुंब्रा, कोपरमध्ये मोठ्या प्रमाणावर खारफुटीचा ऱ्हास होत आहे. उपनगरे आणि ठाण्यातील खारफुटीचे आच्छादन कमी होण्याचे एक कारण म्हणजे ट्रान्स-हार्बर लिंक, वाशी पुलाचा विस्तार यांसारखे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प असल्याचे उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी संरक्षण समितीचे सदस्य स्टॅलिन डी म्हणाले.
....
राज्यातील खारफुटीचे आच्छादन २००५ ते २०१३ पर्यंत १८६ चौरस किलोमीटरवर स्थिर राहिले. त्यानंतर २०१५ मध्ये अचानकपणे २२२ चौरस किलोमीटरवर झेप नोंदवली गेली. खारफुटीचे आच्छादन मॅप करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपग्रह प्रतिमांद्वारे वनस्पतींचे ठराविक काळाने विश्लेषण केले जाते आणि नंतर मागील वनस्पतींशी तुलना केली जाते. शेवटच्या अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक १२,१०८ चौ.कि.मी.वर आच्छादन आहे. अहवालानुसार, महाराष्ट्रात खुल्या वन श्रेणीत १० चौरस किमीची किरकोळ घट झाली आहे, परंतु ‘अत्यंत घनदाट’ वनामध्ये १३ चौरस किमी आणि १७ चौरस किमीची वाढ झाली आहे. अनुक्रमे जंगल आणि ‘मध्यम घनदाट जंगल’ एकत्रित वनक्षेत्र २० चौरस किमीने वाढले आहे.
....
सर्वाधिक वाढ हैदराबाद, दिल्लीमध्ये
११०.७७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात देशातील सात प्रमुख शहरांमध्ये मुंबई हे दुसऱ्या क्रमांकाचे वृक्षाच्छादित शहर असले तरी गेल्या दशकात त्यात किरकोळ नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्रीन कव्हरमध्ये सर्वाधिक वाढ हैदराबाद आणि दिल्लीमध्ये झाली; तर अहमदाबाद, बेंगळूरु आणि कोलकाता येथे तोटा झाला.