धावत्या लोकलमध्ये फळविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
तिघांना अटक; हल्लेखोरांमध्ये एक अल्पवयीन
नवी मुंबई, ता. ३१(वार्ताहर) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तिघा तरुणांनी लोकलच्या लगेज डब्यातून फळे घेऊन जाणाऱ्या विष्णू राममिलन वर्मा (२२) या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी भरदुपारी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकादरम्यान घडली. हल्ल्यात विष्णू वर्मा गंभीर जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी कसून तपास करून तीन तरुणांना तरुणांना अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
विष्णू वर्मा व त्याचा चुलत भाऊ रामसजीवन वर्मा (२५) हे दोघेही ठाण्यातील नौपाडा भागात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी ते तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमधून फळ विकत घेण्यासाठी नियमित येतात. गत शनिवारी दोघे भाऊ एपीएमसी मार्केटमध्ये फळ विकत घेण्यासाठी आले होते. दुपारी दीडच्या सुमारास फळे घेऊन विष्णू आणि रामसजीवन तसेच त्यांच्या ओळखीतील दिपू गुप्ता या तिघांनी ठाण्याला जाण्यासाठी तुर्भे रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. तिघेही लगेज डब्यातून प्रवास करत असताना डब्यात बसलेल्या शुभम शिवाजी अभंग (१९) याने रामसजीवन याच्या फळाच्या पिशवीतील किवी चोरण्यासाठी पिशवीत हात घातल्याने रामसजीवनने त्याला अडवले. त्यामुळे शुभमने कपडे खराब केल्याचा बहाणा करून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी विष्णू वर्मा याने शुभमला समजावण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा राग आल्याने शुभमचा मित्र किशोर सोनवणे व १७ वर्षीय अल्पवयीन साथीदाराने विष्णूला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दिपू गुप्ता यानेही तिघांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र किशोर सोनवणे याने रामसजीवन याला पट्ट्याने मारहाण केली. तर शुभमने आपल्याजवळ असलेला चाकू काढून विष्णूच्या छातीवर व पोटावर वार केले. याचवेळी कोपरखैरणे रेल्वे स्थानक आल्याने तिघांनी पलायन केले.
तिघांच्या हल्ल्यात विष्णू वर्मा गंभीर जखमी झाल्याने रामसजीवन व दिपू गुप्ता यांनी त्याला कोपरखैरणे रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी विष्णूला आधी वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात त्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी तत्काळ कोपखैरणे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शुभम शिवाजी अभंग (१९) व किशोर नारायण सोनवणे (१९) या दोघांना कोपरखैरणेतून अटक केली. तसेच आपल्या मुळ गावी सातारा येथे पळून गेलेल्या त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला सातारा येथून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने यातील दोन आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
- विष्णू केसरकर, वरिष्ठ निरीक्षक, वाशी रेल्वे पोलिस